नुकत्याच एका मुलाखतीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर ‘हरामखोर मुलगी’ म्हणून टीका केली. त्यांच्या या टिप्पणीवर अनेकांनी आक्षेप घेतला. संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. त्यावर जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याचा विचार करेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी ‘एएनआय’शी बोलताना दिली. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळतेय.

“तिने मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं. हेच अहमदाबादबद्दल बोलायची तिच्यात हिंमत आहे का?”, असा सवाल राऊतांनी यावेळी केला. संजय राऊतांनी कंगनावर ‘हरामखोर’ अशी टिप्पणी केल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झा, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विट करत ते विधान योग्य नसल्याचं म्हटलं. दिया मिर्झाने राऊतांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

कंगनाने तिच्या एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तिच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी तिच्यावर टीका केली. यात सेलिब्रिटींपासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकांनी कंगनाला खडेबोल सुनावले आहेत. त्यातच अलिकडे झालेल्या एका मुलाखतीत संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर मुलगी’ असं म्हटलं होतं.