अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती. कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारलाही एक मागणी केली आहे.

“मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने भाजपा नेते राम कदम यांच्या मागणीवर दिलं होतं. इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज,” असंही कंगना म्हणाली होती.

आणखी वाचा- “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, राम कदमांच्या मागणीवर कंगनाचं उत्तर

कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना उत्तर दिलं आहे. “जर हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील व्यक्ती राहत असेल आणि ती जर असं म्हणत असेल की माझा शिमला पोलिसांवर विश्वास नाही. अशा वेळी मी म्हणेल की जर विश्वासच नाही, तर शिमलामध्ये राहू नको. तुम्ही तिथं राहता, खाता, तिथं कमवता, ओळख मिळवता आणि शिमला पोलिसांवर थुंकता. मग हा काय तमाशा आहे. जर मी या राज्यात राहतो, तर माझा अधिकार आहे, पोलिसांसोबत संवाद ठेवण्याचा. जर मला काही समस्या असेल तर त्यांना सांगेल. कुणीही व्यक्ती मुंबई पोलीस, राज्य सरकार यांच्याविषयी बोलते. हे बरोबर नाहीये. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आवाहन करतो की, जे लोक मुंबई पोलिसांविषयी वाईट बोलत आहेत. आणि राज्यातील जे राजकीय पक्ष अशा व्यक्तींचं समर्थन करत आहेत, अशांविरुद्ध कारवाई करावी,” असं राऊत म्हणाले.

कंगना ट्विटमध्ये मुंबई पोलिसांबद्दल काय म्हणाली होती?

राम कदम यांच्या ट्विटवर बोलताना कंगनानं हे ट्विट केलं होतं. “सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं.