अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला आत्महत्येसाठी कथितरीत्या प्रवृत्त केल्याबद्दल अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह इतरांविरुद्ध पाटणा येथे नोंदवण्यात आलेला प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) आणि त्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) हस्तांतरित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मंजुरी दिली. या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या मुंबई पोलिसांची कार्यकक्षा मर्यादित असून या प्रकरणात सखोल तपास होणं गरजेचं आहे असं न्यायालयाने सांगितलं. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर विरोधक आणि महाराष्ट्र सरकारच्या बाजूने बोलणारे असे दोन गट सोशल नेटवर्किंगवर पडल्याचे चित्र दिसून आलं. ट्विटवर तर या प्रकरणासंदर्भातील अनेक हॅशटॅग ट्रेण्ड होत होते. याचदरम्यान अनेकांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचीही आठवण झाली. आज राऊत यांनी शायरी किंवा एखादा शेर ट्विट केला नाही असा खोचक टोला काहीजणांनी ट्विटवरुन लागवाल्याचे पहायला मिळाले. निकालाच्या दिवशी राऊत यांचा शायराना अंदाज दिसून आला नसला तरी आज सकाळीच त्यांनी 'संजय ऊवाच' या मथळ्याखाली एक शेर ट्विट केला आहे. नक्की वाचा >> “नाचत नाचत सांगताना त्यांनी हातात केवळ भाजपाचा झेंडा घेणं बाकी होतं”; राऊतांचा बिहारच्या डीजीपींना टोला "उनसे कहना की.. किस्मत पे इतना नाज ना करे.. हमने बारिशों मे भी जलते हुए मकान देखे है.", असं ट्विट राऊत यांनी केलं आहे. तसेच या ट्विटखाली त्यांनी जय महाराष्ट्र असंही लिहिलं आहे. हे ट्विट नक्की कशासंदर्भात आहे याबद्दल राऊत यांनी थेट उल्लेख केलेला नसला तरी जय महाराष्ट्र या शब्दांवरुन हे ट्विट हे सुशांत प्रकरणावरुन असल्याचे स्पष्ट होतं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची गरज नव्हती, मात्र बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे राजकारण केलं जात असल्याचंही राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर म्हटलं होतं. मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र सरकारची भूमिकेचे समर्थन करणाऱ्या राऊत यांनी थेट शेर ट्विट करत आता नशिबावर एवढा गर्व करु नका असंच विरोधकांना सुचित केलं आहे. ::संजय ऊवाच:: "उनसे कहना की.. किस्मत पे इतना नाज ना करे.. हमने बारिशों मे भी जलते हुए मकान देखे है." जय महाराष्ट्र!! — Sanjay Raut (@rautsanjay61) August 20, 2020 नक्की वाचा >> संजय राऊत म्हणतात, “निकालाची स्क्रीप्ट आधीपासूनच तयार असेल तर…” राज्यामधील विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरु असतानाही संजय राऊत रोज ट्विटरच्या माध्यमातून शायरी पोस्ट करत आपली भूमिका मांडताना दिसले होते. त्यामुळेच कालच्या निकालानंतर राऊत यांनी काही ट्विट कसं केलं नाही असा प्रश्न ट्विटवर अनेकांनी विचारला होता.