जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे नीरा स्नान आज(दि.२६) सकाळी देहू नगरीत पार पडले. करोनाच्या संकटामुळे जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पादुका 30 जूनला पंढरपूरला रवाना होणार आहेत. प्रस्थान झाल्यापासून पादुका मुख्य मंदिरात विसावलेल्या आहेत. 12 जूनला अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे प्रस्थान झाले. यावेळी उपस्थित वारकरी संप्रदाय आणि इतर भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत पूर्ण सोहळा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करत पार पडला. दरम्यान ,देहू नगरीत पालखी मुक्कामी असताना ही आज नीरा स्नान पार पडले आहे. परंपरेनुसार जिथं नीरा स्नान पार पडतं तिथून देहू संस्थानने रात्रीतच हंडाभर पाणी आणले आणि तुकोबांच्या मंदिरालगतच्या इंद्रायणी नदीत हा सोहळा पार पाडला आहे. यावेळी तुकोबांच्या पादुका इंद्रायणी तिरी नेण्यासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आला होत्या. इंद्रायणी नदीत विधिवत पूजा आणि आरती पार पडली.