ठाणे : बदलापुरातील २७-२८ जुलैच्या जलप्रलयाने ‘पाणवठा-अपंग प्राण्यांच्या अनाथाश्रमा’ची हानी केलीच, पण तेथील दहा प्राण्यांचाही बळी घेतला. त्यामुळे महापुराच्या तडाख्यात सापडलेला अपंग प्राण्यांचा हा ‘अनाथाश्रम’ पुन्हा उभारण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला महापूर आला. नदीतील पाण्याने पात्र सोडले आणि ते आसपासच्या गावांत घुसले. महापुराच्या तडाख्यात चामटोली गावही सापडले. तेथील अपंग प्राण्यांच्या अनाथाश्रमाची-पाणवठय़ाची प्रचंड हानी झाली. महापुरात प्राण्यांचे खाद्य आणि औषधे वाहून गेली. पिंजऱ्यांचे नुकसान झाले. पाय नसल्याने धावणे-पळणे मुश्कील, नेत्रहीन असल्याने सभोवती पसरलेला अंधार अशा परिस्थितीत तेथील मांजर आणि श्वानांसह दहा प्राण्यांनी जलसमाधी घेतली. पुरामुळे कोलमडून पडलेला मूक पाणवठा मदतीकडे डोळे लावून बसला आहे. त्याच्या पुनर्उभारणीसाठी संचालक गणराज जैन यांना आर्थिक साह्य़ाची गरज आहे. यासाठी मदत हवी पुरामुळे पाणवठय़ाची लोखंडी शेड मोडली आहे. औषधे ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या रेफ्रिजरेटरचे नुकसान झाले. प्रकल्पाचे सर्व कुंपण, पाण्याची मोठी टाकी पुरात वाहून गेली आहे. बायोगॅस युनिटचीही हानी झाली आहे. त्यासाठी अर्थसाह्य़ाची गरज आहे. पाणवठा प्रकल्पात अपंग प्राण्यांचा सांभाळ केला जातो. आजारी प्राण्यांवर उपचार करून त्यांना कायमस्वरूपी आसरा दिला जातो. मात्र निधीअभावी त्यांच्यावरील उपचारांवर मर्यादा येतात. प्रकल्पात वीज आणि पाण्याची समस्या आहे. कूपनलिकेची सुविधा उपलब्ध झाल्यास पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. प्रकल्पात ३० विशेष पिंजऱ्यांची आवश्यकता आहे. प्राण्यांसाठी महिन्याला ३०० किलो तांदळाची आवश्यकता असते. श्वान आणि मांजरींच्या खाद्यासाठी प्रति महिना २० हजार रुपयांची गरज असते. प्रतिमहिना ४ ते ५ हजार रुपयांची औषधे लागतात. पुढील योजना प्रकल्पाला सरकारने अपंग प्राण्यांच्या अनाथाश्रमाचा दर्जा द्यावा, अशी गणराज जैन यांची इच्छा आहे. पुन्हा पूर आल्यास नुकसान होऊ नये याकरिता प्रकल्पातील बांधकामाची उंची वाढवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रकल्पात १०० बाय ६ फुटांचा एक पूल उभारण्याचे नियोजन आहे. जेणेकरून पुराचे पाणी प्रकल्पात शिरल्यास प्राण्यांना पुलावरून सुरक्षितस्थळी हलवता येईल. पुलाच्या खालील बाजूस मोठे पिंजरेही उभारण्यात येणार आहेत. पाणवठा प्रकल्प चालवण्यासाठी महिन्याकाठी ६० ते ७० हजार रुपयांची गरज असते, तर पुरामुळे हानी झालेला प्रकल्प पुन्हा उभारण्यासाठी २० ते २२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.