पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी जीप आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे.  रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जीप धडकल्याने झालेल्या या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. तरअन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

सावंतवाडीहून मुंबईकडे जाणाऱ्या जीप चालकाचा ( जीप क्र. एमएच ४७एबी१७८४)  ताबा सुटल्याने खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी जुन्या टोल नाक्याजवळ उभ्या असलेल्या माल ट्रकवर (के. एल.१६- यु ४४२०) जाऊन आदळली. या भीषण अपघातात विलास सामंत (पाट ता .कुडाळ सिंधुदुर्ग ,) बाळकृष्ण सामंत ( दहिसर मुंबई), विनायक कामत ( तळवडे ता .सावंतवाडी) हे जागीच ठार झाले. तर, स्मिता कामत ( तळवडे ता .सावंतवाडी) व चालक रवी गावकर ( जुहुसर्कल ,मुंबई) हे दोघे जण गंभीर जखमी झाले .

तिघांचेही मृतदेह बाहेर काढून खंडाळा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. गंभीर जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हा  अपघात चालक रवी गावकर यांच्या गलथन पणामुळे झाला आहे असे पोलिसांनी सांगितले.