या हंगामाची एफआरपीनुसार होणारी संपूर्ण रक्कम वेळेत देणारा अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यातील पहिलाच साखर कारखाना ठरला आहे. करोनासारख्या महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला अजिंक्यतारा साखर कारखान्याने या हंगामातील तिसरा हप्ता आज शेतकरी सभासदांच्या खात्यावर जमा केला आहे. अजिंक्यतारा कारखान्याने या हंगामात गाळपासाठी आलेल्या ऊसाला २,७९० रुपये प्रतिटन दर दिला आहे. कारखान्याने या हंगामात सहा लाख १२ हजार ९१७ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून १२.८४ टक्के अशा विक्रमी साखर उताऱ्याने सात लाख ७० हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन दोन हजार पाचशे रुपये पहिला आणि त्यानंतर १५० रुपये दुसरा तर १४० रुपये तिसरा हप्ता अदा केला. करोनाचे संकट सुरु झाल्यापासून कारखान्याने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम केले. आता पावसाळा सुरु झाला असून शेतीची कामे सुरु झाली आहेत. मशागत, बी-बियाणे, खते, औषधे आदी खरेदीसाठी शेतकरी नेहमीच कारखान्याच्या बिलावर अवलंबून असतो. एकीकडे करोनाचे संकट आणि त्यामुळे आलेली आर्थिक मंदी या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला अजिंक्यतारा कारखान्याने सावरण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई आणि संचालक मंडळाने योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करून गाळपास आलेल्या सहा लाख १२ हजार ९१७ मेट्रिक टन ऊसाची एफआरपीतील उर्वरित रक्कम म्हणजेच १४० रुपये प्रतिटन याप्रमाणे एकूण ८ कोटी ५८ लाख ८ हजार ६२१ रुपये रक्कम आज संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली आहे. मागील वर्षीसुद्धा एफआरपीनुसार कारखान्याने संपूर्ण रक्कम वेळेत अदा केली होती. त्यामुळे राज्याच्या साखर आयुक्तांनी लेखी पत्राद्वारे कारखान्याचे कौतुक केले होते. या गळीत हंगामातही कारखान्याने वेळेत संपूर्ण एफआरपी अदा करण्याची परंपरा कायम राखली आहे. कारखान्याने सभासदांचे करोनापासून रक्षण व्हावे यासाठी सवलतीच्या दरात हॅन्ड सॅनिटायझर पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. करोनापासून स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन, शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.