वाई:साताऱ्याचा करोना आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर परिचारिका कर्मचारी निधी आदी वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे मात्र करोनाची साखळी तोडण्यासाठी सातारकरांनीच प्रशासनाला सहकार्य करून करोना आटोक्यात आणण्यासाठी शिकस्त करावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संगितले.

करोनाच्या वाढत्या संसर्गाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित बैठकीला पालक मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण,अरुण लाड, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.या बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.

सातारा जिल्ह्याची करोनाची परिस्थिती चिंताजनक परंतु नियंत्रणात आहे .पूर्ण  नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्यासाठी बारीकसारीक गोष्टींचा आजच्या बैठकीत आढावा घेतला असल्याचे सांगून पवार म्हणाले करोना नियंत्रणासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. साताऱ्याच्या जम्बो  कोविडं रुग्णालया प्रमाणे फलटण माण भागातील रुग्णांसाठी फलटण येथे आणखी एक जंम्बो कोविडं रुग्णालय सुरू करावे.जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या गावात तीस खाटांचे करोना काळजी केंद्र,विलीगीकरण  कक्ष सुरु करावेत.गृह विलगीकरणामुळे आख्खेच्या आख्खे कुटुंब बाधित होवून करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गृह विलगीकरण बंद करुन संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे.करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध लावून त्यांची  पहिल्यांदा करोना चाचणी करा. कडक निर्बंध असतानाही काही नागरीक बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहेत, अशांवर पोलीस विभागाने कडक कारवाई करावी.शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर, तसेच इलेक्ट्रिक ऑडीट करा. हे ऑडीट सातत्याने करावे अशा सूचना पवार यांनी केल्या.

साखर कारखान्यांनी प्राणवायू प्रकल्प १५जून पर्यंत सुरु करावेत, यासाठी त्यांच्यासोबत बैठका घ्या. प्रत्येक नागरिकाला योग्य पद्धतीने उपचार मिळावेत यासाठी राज्य शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

जास्तीत जास्त नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यावर भर द्यावा.शहरी व ग्रामीण भागात गृह विलगीकरणातील करोना रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात हलवावे,   करावी.रुग्णांवर चांगल्या पद्धतीने औषधोपचार करावेत.ज्या करोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेतले आहेत, परंतु जी प्रकरणे प्रलंबीत आहेत अशी प्रकरणे तात्काळ मंजुर केली जातील असे  राजेश टोपे यांनी सांगितले.

बैठकीमध्ये बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई,  श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, पृथ्वीराज चव्हाण, अरुण लाड, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे,दिपक चव्हाण यांनी उपयुक्त अशा सूचना केल्या.