साताऱ्यात काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओढे नाले, धबधबे ओसंडून वाहू लागल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील जलसाठ्यात चांगलीच वाढ सुरू आहे. जिल्ह्यातील उरमोडी धरण पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाच्या चारही वक्र दरवाज्यांमधून विसर्ग उरमोडी नदी पात्रात करण्यात येत आहे. परळी खोऱ्यात पावसाने संततधार सुरु ठेवल्याने उरमोडी धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने गुरुवार (दि १७) मध्यरात्री पासून चारही वक्र दरवाजे उचलून ७५० व विद्युत गृह २०० असा एकूण ९५० क्यूसेक विसर्ग उरमोडी नदी पात्रात सुरू करण्यात आला होता. गुरुवारी रात्री व आज दिवसभर पावसाचा मारा पाणलोट क्षेत्रात कायम राहिल्याने पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.त्यामुळे आज शुक्रवार (दि१८) दुपारी चार वक्रदरवाजे पुन्हा उचलण्यात आले आहेत. सध्या उरमोडी नदी पात्रात होत असलेला एकूण विसर्ग १४१३ क्यूसेक्स, कालवा १०० क्यूसेक, अशाप्रकारे धरणातून होत असलेला एकूण विसर्ग १५१३ क्यूसेक इतका सुरू असून या कालावधीत उरमोडी नदीपात्रातून ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.