पुणे, नांदेड, सातारा-सांगली, जळगाव, यवतमाळ आणि भंडारा-गोंदिया या विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात आज मतदान होत आहे. सहा जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी सातारा-सांगली मतदारसंघात आज सकाळपासूनच उत्साहात मतदान पार पडताना दिसत आहे. मात्र, सकाळच्या सत्राच्या तुलनेत दुपारपासून मतदानाने वेग घेतलेला दिसत आहे. मतदानाला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत ११.५८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुसऱ्या सत्रात या मतदारसंघातील आठ मतदान केंद्रांवर दुपारी १२ वाजेपर्यंत ५२.९८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सातारा-सांगली हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला, पण या वेळी या बालेकिल्ल्यातच धुसफुस सुरू झाली आहे. अजित पवार यांनी शेखर गोरे यांना पक्षात आणून उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजीची भावना आहे. जयंत पाटील, उदयनराजे भोसले या साऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम हे रिंगणात आहेत. आधी सोपी वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीसाठी कठीण झाली. त्यामुळे २२ तारखेला होणाऱ्या मतमोजणीचा निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.