साताऱ्याहून मुंबईत आपल्या विविध मागण्या घेऊन काही शेतकरी अर्धनग्न होऊन मुंबईत मंत्रालयावर मोर्चा घेऊन आले आहेत. रविवारी या शेतकऱ्यांना मानखुर्द येथे पोलिसांनी अडवलं होतं. त्यानंतर या शेतकऱ्यांचा मुक्काम चेंबूर मधील साधू वासवाणी या शाळेत करण्यात आला होता. या शेतकऱ्यांना थेट मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता. पण, पोलीस यातील 5 जणांच्या शिष्टमंडळाला आपल्याच गाडीतून मंत्रालयात नेणार आहेत.

आपल्या विविध मागण्यांबाबत या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्योगमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे. “मात्र चर्चेतून मार्ग निघाला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करु,” असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

साताऱ्यातील खंडाळा एमआयडीसीत गेलेल्या जमिनीबाबत फसवणूक झाल्याचा आरोप करत हे शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघाले होते. मात्र, मुंबईच्या वेशीवर मानखुर्दमध्ये काल त्यांना पोलिसांनी अडवलं, त्यानंतर त्यांच्यातल्या पाच शिष्टमंडळाला आज पोलीस आपल्याच आपल्याच गाडीतून मंत्रालयात नेणार आहेत. सातारा जिल्ह्यातल्या धनगरवाडी, केसुर्डी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, मोर्वे, भादे, अहिरे गावातील शेतकरी खंडाळ्याहून अर्धनग्नावस्थेत पायी चालत आले आहेत.