देशात सुरु असलेल्या पुतळ्यांच्या विटंबनेचे लोण आता औरंगाबादमध्येही पोहचले आहे. समर्थनगर भागात असलेल्या स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या पुतळ्याला काही समाजकंटकांनी डांबर फासल्याचा प्रकार घडला. ही घटना घडल्यावर शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शिवसैनिक आणि सावरकरप्रेमींनी याप्रकरणी रस्त्यावर उतरून निषेध केला. त्यानंतर तातडीने या पुतळ्याला रंगरंगोटी करण्यात आली. तसेच पुष्पहार अर्पण करत आदरांजलीही वाहण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. पुतळ्याची विटंबना झाल्याचे समजताच शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार अतुल सावे, विहिंपचे शैलेश पत्की, हिंदुत्त्वावादी आणि सावरकर प्रेमी भाऊ सुराडकर यांनी तातडीने समर्थ नगरकडे धाव घेतली. औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील पुतळा प्रकरण कळताच त्या ठिकाणी धाव घेतली. रस्त्याचे काम सुरु असल्याने सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.