शालेय गणवेश आणि इतर साहित्य ठराविक दुकानातून अथवा शाळेतून खरेदी करण्याची सक्ती शाळांनी करु नये. पालकांनी देखील अशी सक्ती झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन मनविसेचे धुळे जिल्हा अध्यक्ष अॅड. प्रसाद देशमुख यांनी केले आहे. सध्या टाळेबंदीमुळे समाजातील सर्वाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अनेक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ऑनलाइन वर्गही सुरू केले आहेत. अनेक शाळा, महाविद्यालय हे आपल्या शाळेचा आर्थिक फायदा व्हावा म्हणून ठराविक दुकानातूनच शालेय साहित्य खरेदी करण्याचा दबाव पालकांवर टाकत असतात. त्यामुळे पालकांची आर्थिक पिळवणूक होते. टाळेबंदीत पालकांसाठी ही आर्थिक पिळवणूक न झेपणारी आहे. नाशिक विभागीच शिक्षण उपसंचालकांनी परिपत्रकाव्दारे शालेय गणवेशासह इतर साहित्य ठराविक दुकानातून घेण्याची सक्ती शाळा, संस्थांनी विद्यार्थी आणि पालकांवर करू नये, शालेय दैनंदिन आणि इतर शैक्षणिक साहित्य तसेच गणवेशाबाबत पालकांची मते जाणून घेऊन बहुमताने ठराव संमत करून त्याची अमलबजावणी करण्याविषयीच्या सूचना केल्या आहेत. या परिपत्रकाची अनेक पालकांना माहिती नसल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांवर करू नये, अन्यथा कायदेशीर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अॅड. देशमुख यांनी दिला आहे. पालकांनीही शाळेत अशी सक्ती केली जात असेल तर शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी अथवा मनविसेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.