अमरावती : दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही कडू यांनी स्पष्ट केले. करोनाच्या संकटातून सावध पावले टाकत केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी- पालकांचे लक्ष लागले होते. टाळेबंदी लागू झाल्यानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद होती. आता शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी राज्य सरकार करत आहे. सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थाना प्रवेश दिला जाणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले. शाळा सुरू करण्यापूर्वी एक धोरण आखण्यात येणार आहे. या धोरणामुळे विद्यार्थामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याची काळजी घेतली जाणार आहे. एखाद्या शिक्षकाचे वय ५०च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दुसऱ्या शिक्षकाला तिथे घेता येईल का? तसेच काही कालावधीनंतर नियमित विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्यात येऊ शकते का? असाही विचार सुरू असल्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.