विज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणासाठी व्हावा, त्यामुळे देशाची प्रगती साधली जाईल तशीच माणसाची प्रगतीही साधली जाण्याची गरज निर्माण झाली असून, विद्यार्थिदशेतूनच विज्ञानाला प्राधान्य देण्याची गरज डॉ. मानसी राजाध्यक्ष यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पाचवे वसुंधरा विज्ञान संमेलन सावंतवाडी नगरपालिका व वसुंधरा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर अणुविज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. राजाध्यक्ष बोलत होत्या.या वेळी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, संस्थाध्यक्ष प्रदीप बर्डे, भाग्यविधाता वारंग, वंदना करंबेळकर, प्रा. अरुण पणदूरकर, नगरसेवक उपस्थित होते. सावंतवाडी नगरपालिकेने कचऱ्यापासून वीजनिर्मिती तयार करण्याचा मानस ठेवून प्रकल्प हाती घेतला आहे, असे नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी सांगून सायन्स सेंटर निर्माण करण्याचा नगर परिषदेचा संकल्प आहे. देशात वीजनिर्मितीसाठी विज्ञानात आणखी प्राधान्य व संशोधनाची गरज साळगांवकर यांनी व्यक्त केली. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, पल्लवी केसरकर, वंदना करंबळेकर, के. एम. पटाडे आदींनी विचार मांडले. सावंतवाडी शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली होती. सकाळी विज्ञान दिंडी काढण्यात आली. या विज्ञान दिंडीत चित्ररथ, पथनाटय़, एनसीसी संचलन व बॅण्डपथकासह विज्ञान पालखीची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. या विज्ञान ग्रंथ दिंडीचे पूजन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले. शिवाय स्त्रीभ्रूण हत्या पथनाटय़ात स्वातंत्र्यपूर्व काळापासून महिलांनी घेतलेली विविध क्षेत्रांतील आघाडी कळसुलकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मांडली.