रस्त्यांवरील वाहनांची गर्दी व प्रदूषण कमी करण्यासाठी चंद्रपूर, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, लातूर, औरंगाबाद व जळगाव या दहा शहरांमध्ये ‘स्ट्रीट्स विथ सायकल ट्रॅक’ हा पथदर्शी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध नसल्याने नागरिक सुरक्षिततेचा विचार करता सायकलींचा वापर करण्यास धजावत नाहीत. बऱ्याच शहरांमधील औद्योगिक वसाहतींमध्ये शहराबाहेरून साधारणत: सात ते आठ किलोमीटर अंतरावरून कामगार वर्ग शहरात येतो. या जोडरस्त्यांलगत सायकलस्वारांसाठी सुविधा निर्माण झाल्यास कामगार वर्ग सुध्दा सायकलींचा वापर करून शहरात येऊ शकतात. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कामी प्रमाणात कमी होईल तथा प्रदूषण कमी होण्यास मदत होईल हा दृष्टीकोण समोर ठेवून राज्य सरकारने दहा प्रमुख शहरांमध्ये ‘स्ट्रीट्स विथ सायकल ट्रॅक’ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.  निवड झालेल्या दहाही शहरांमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर विभागामार्फत हा प्रकल्प राबवून प्रकल्पांना मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन संपूर्ण राज्यात असा प्रकल्प राबविण्याचा शासनाचा मानस आहे. अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.  सदस्य म्हणून मिशन ऑलिम्पिक्स, अमरावतीचे सचिव दीपक आत्राम व मिशन ऑलिम्पिक्स, ठाणे, पश्चिमचे सदस्य रवींद्र पाठक यांचा समावेश आहे. ही समिती शहरांमधील जागेची उपलब्धता  विचारात घेऊन सुयोग्य रस्त्यांची या प्रकल्पासाठी निवड करणार आहे.