राज्यमंत्री बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी गेल्या २६ मार्चला करोनाची चाचणी करून घेतली. तिचा अहवाल नकारात्मक आला असला, तरी त्यांनी पुढील दहा दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण करोनाचा आढळला नाही. मात्र, बच्चू कडू यांना ताप व खोकला असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. ते अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. काही दिवसांमध्ये  ते अचलपूर मतदार संघात प्रशासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या मदत आणि इतर कामांसाठी सातत्याने लोकांच्या संपर्कात येत होते.  ताप आणि खोकल्यामुळे त्यांना करोनाची लागण झाल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी गेल्या २६ मार्चला करोनाची चाचणी केली होती. त्याचा अहवाल नकारात्मक प्राप्त झाल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यांनी इतरांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:ला १० दिवसासाठी घरीच विलगीकरण करून घेतले आहे. कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये, चिंता करू नये तसेच स्वत:ची काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काळजी करण्याचे कारण नाही

आपल्याला ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण करोनाची चाचणी करून घेतली, त्याचा अहवाल नकारात्मक आला आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण विलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी देखील आपली काळजी घ्यावी. घराबाहेर पडण्याचे टाळावे.

– बच्चू कडू, राज्यमंत्री.