धवल कुलकर्णी

सध्या सगळा समाज करोना व्हायसरसोबत लढा देतो आहे. अशात मुस्लिम समाजाच्या वस्त्त्यांमध्ये आणि मोहल्ल्यांमध्ये पोलिसांसोबत करण्यात आलेल्या गैरवर्तनाचे व्हिडिओ समाज माध्यमावर पसरवून कुठेतरी दोन समाजामध्ये असलेली तेढ वाढवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.

“महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोलीस मुस्लिम मोहल्ल्यामध्ये गेल्यावर त्यांच्याबाबत काही स्थानिक लोकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. या अशा घटनांचा वापर हा मुस्लिम समाजाच्या बाबत द्वेष आणि घृणा निर्माण करण्यासाठी होतो,” असे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितले. कदाचित या घटना व्यवस्थेवरचा नैराश्यातून सुद्धा होत असतील, पण याचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. काही मूठभर लोकांच्या दुष्कृत्यांचा परिणाम सर्व समाजाला भोगू लागू शकतो, असे तांबोळी म्हणाले.

सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे आणि त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे हिंसक कृत्य करणे याला धर्माचा आधार नाही. त्याच बरोबर रमजानमध्ये सामूहिक प्रार्थनेला महत्त्व असले तरीसुद्धा आज बहुतांश मुस्लिम समाज हा करोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन तसे करत नाहीये. पण या मूठभर लोकांच्या चुकांचे खापर यांच्या डोक्यावर सुद्धा फुटू शकते. मात्र अशा घटना मुस्लिमेतर लोक राहतात त्या भागात सुद्धा घडले आहेत.

पण अशा घटना होणं हेच दुर्दैवी आहे. कारण पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून करोनाचा मुकाबला करायला यंत्रणेला मदत करत आहेत. काही पोलिसांना या रोगाची ची लागण झाली असून, काही जण शहीद सुद्धा झाले आहेत. आपल्या जीवावर हे बेतू शकते हे माहित असून सुद्धा हे लोक जमिनीवर काम करत आहेत आणि याची जाणीव समाजाने ठेवायला हवी असे आवाहन तांबोळी यांनी केले.

अशा घटना होणे म्हणजे सामाजिक मग्रुरी चे लक्षण आहे. काही लोक स्वतःचा अहंकार दाखवण्यासाठी अशा घटना करतात आणि दुर्दैवाने त्याला एक सामाजिक स्वरूप प्राप्त होते आणि या सर्वांचे पडसाद समाजावर उमटतात.

मुस्लिम समाजाने आज निकोप पातळीवर विचार करायला आणि व्यक्त व्हायला हवं. सध्याची परिस्थिती ही न टाळता येण्याजोगी आहे. या रोगाची बाधा कुणाला सुद्धा होऊ शकते. पण दुर्देवाने याबाबत वैज्ञानिक दृष्टीचा अभाव दिसतो आणि लोक बुद्धीपेक्षा भावनेने अधिक विचार करतात. काही मंडळी स्वतःला स्वतःच्या गल्ली मोहल्ल्यातील दादा बादशाह किंवा भाई असे भासवतात आणि त्याचा प्रभाव इतरांवर पाडतात. हे लोक विवेकाने विचार करत नाहीत आणि यांची कृती फक्त तात्कालिक असते असे तांबोळी म्हणाले.

३ मे म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक आणि मुस्लिम समाजातले कर्ते धर्मसुधारक हमीद दलवाई यांची पुण्यतिथी. बहुपत्नीत्व, तिहेरी तलाक, निकाह हलला, यासारख्या मुस्लिम समाजा मधल्या कुप्रथा बाबत हमीद दलवाई यांनी लढाऊ भूमिका घेतली होती. आज बरोबर त्यांनी समाजातल्या धर्मांधतेचा सुद्धा धिक्कार केला होता.