अणुस्फोट घडविण्याची पाकिस्तानची क्षमता नव्हती. चीनकडून मिळालेले तंत्रज्ञान आणि प्लुटोनियमच्या आधारावर त्याने चाचणी घेण्याची तयारी केली. पाकिस्तानसारख्या राष्ट्राकडे ही क्षमता राहील. त्यामुळे आपण कमी पडू नये म्हणून अणूचा शांततेकरिता वापर या तत्त्वाने काम करणाऱ्या भारतालाही राजस्थानच्या पोखरण येथे वेगवेगळ्या कालखंडात चाचण्या घेणे क्रमप्राप्त ठरले, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी केले. हा निर्णय पूर्णपणे राजकीय असल्याने तो नैतिकदृष्टय़ा योग्य की अयोग्य, यावर भाष्य करण्यास त्यांनी असमर्थतता व्यक्त केली. नाशिक येथे आलेल्या डॉ. गोवारीकर यांच्या उपस्थितीत शनिवारी शहरात विविध कार्यक्रम झाले. मविप्र शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘डॉ. होमी भाभा यांचे भारताच्या अणुविज्ञान क्षेत्रातील योगदान आणि अणुक्षेत्रातील भारताची कामगिरी व आजपर्यंतचा प्रवास’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. या वेळी विद्यार्थ्यांनी अणुबॉम्बची संहारक शक्ती ज्ञात असूनही भारताने त्याची चाचणी का केली, या उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा व नागासाकी शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बची तांत्रिक माहिती त्यांनी दिली. पूर्वीच्या काळात युरेनियमचा वापर करून अणुबॉम्बची निर्मिती केली गेली. आधुनिक काळात बॉम्बसाठी युरेनियमपेक्षाही भयावह प्लुटोनियम या मानवनिर्मित रसायनाचा वापर केला जातो. त्याची संहारक क्षमता युरेनियमच्या तुलनेत किती तरी पटीने अधिक असल्याचे गोवारीकर यांनी सांगितले. अणुऊर्जेचा शांतता व विकासासाठी वापर करण्याचे धोरण निश्चित करत डॉ. होमी भाभा यांनी भारताच्या अणू विज्ञानाचा पाया रचला. त्यांचे या क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. जगातील काही प्रगत देशांचा या तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यामुळे अमेरिकेने जपानवर अणुबॉम्बचा प्रयोग केल्यानंतर आइनस्टाइनसह जगभरातील शास्त्रज्ञ व्यथित झाले. या स्फोटामुळे झालेल्या नरसंहाराने अनेक शास्त्रज्ञांच्या मनावर परिणाम झाला. अणूचा विध्वंसक कारणांसाठी वापर करायचा नाही हे शास्त्रज्ञांनी निश्चित केले. त्यात डॉ. भाभा यांचाही समावेश होता. त्यांच्या पुढाकाराने अणूचा शांततेसाठी वापर, या विषयावर जागतिक परिषद पार पडली. भाभा यांच्या पुढाकारातून अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाल्याचे गोवारीकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. या वेळी स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी व लीना जाखडी उपस्थित होते. विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढविण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न होणे गरजेचे असून त्यासाठी संस्था व शिक्षक प्रयत्नशील असल्याचे पवार यांनी सांगितले. डॉ. पवार यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मविप्र संस्थेतर्फे कर्मवीर बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात यंग इंजिनीअर्स रोबोटिक प्रयोगशाळेचे उद्घाटन गोवारीकर यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी महापालिकेच्यावतीने आयोजित अंतराळ सप्ताहांतर्गत गोवारीकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.