शरद पवार आणि अजित पवारांपेक्षाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामाचा उरक जास्त आहे. ते व्यक्तिगतपेक्षा सामाजिक प्रश्न मार्गी लावत आहेत. ते सर्वाधिक कर्तबगार मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना बदलण्याऐवजी त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढविल्या जाव्यात, असा घरचा आहेर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे राष्ट्रवादीला दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकाद्वारे उदयनराजे यांनी ही टीका केली आहे, यात पुढे म्हटले आहे, की  विधानसभेच्या निवडणुका दोनतीन महिन्यांवर आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीकडून पसरवले जाणारे बदलाचे चित्र हितावह नाही. नवा चेहेरा आणल्यास कमी काळात त्याला काही करता येणे शक्य नाही. यामुळे मुख्यमंत्री बदलाची कारणमीमांसा न पटणारी आहे. चव्हाण यांनी राज्याचे अनेक प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळले आहेत. दबाब असतानाही चांगले निर्णय घेतले आहेत. चव्हाणांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांनी समाजाभिमुख निर्णय घेतले आहेत. ते अभ्यासू आणि उत्तम प्रशासक आहेत. यामुळे खरेतर आजवरच्या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांची कामगिरी ही सर्वोत्तम आहे. त्यामुळे त्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांच्यामागेच एकदिलाने उभे राहत आगामी निवडणुका लढविण्याचे आवाहन उदयनराजे यांनी या वेळी केले.