काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबाळाच्या नाऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलं आहे. नाना पटोले आपल्या वक्तव्यांमुळे सध्या चर्चेत आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन विरोधक ठाकरे सरकारवर निशाणा साधत असून महाविकास आघाडीत समन्वय नसल्याची टीका करत आहेत. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील नाना पटोले यांना लहान माणूस म्हणत प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. दरम्यान शिवसेनेने खासदार संजय राऊत यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यांवर भूमिका मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्र काँग्रेससह अनेक नेत्यांची बैठक घेतली होती. शरद पवार यांच्या भेटीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एचके पाटील, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता. नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शरद पवारांशी नेत्यांची ही बैठक बोलवली होती. त्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा- शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत?; संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले….

“नाना पटोलेंचा विषय फार चर्चेत राहिलेला आहे. राजकीय नेता जो असतो तो कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतो. स्वबळाची भाषा वापरली जाते. शेवटी निर्णय पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार. त्यामुळे नाना पटोले जे काही बोलले आहेत त्याचा सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होतोय असं मला वाटत नाहीठ, असे संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

आणखी वाचा- काँग्रेसचे रावसाहेब दानवे म्हणणाऱ्या शिवसेनेला नाना पटोलेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

यावेळी काँग्रेसने स्वबळाचा विचार केला तर राष्ट्रवादी आणि शिवसनेला एकत्र यावं लागेल असे राऊत यांनी म्हटल्याचे पत्रकाराने सांगितले त्यावर, “काही राज्यात काँग्रेस इतिहासजमा झाला आहे अस्तित्व नाहीये तरीही तो मोठा पक्ष आहे. निवडणूका स्वबळावर लढायचा निर्णय त्यांचा असेल. शरद पवारांनी काँग्रेसला स्वबळावर लढायचे आहे का असा सवाल केला आहे. ते एकत्र लढत असल्याने शरद पवारचं हा प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे स्वबळ काँग्रेस दाखवत असेल तर शरद पवारांना विचारण्याचा अधिकार आहे. त्याचा शिवसेनेशी संबध नाही,” असे संजय राऊत म्हणाले.