२०१९ची विधानसभा निवडणूक शरद पवारांमुळे सगळ्यांच्याच लक्षात राहिली. पवार आज ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. बारामतीपासून सुरू झालेला पवारांचा राजकीय प्रवास दिल्लीपर्यंत पोहोचला. या काळात पवारांनी अनेक राजकीय धक्के दिले. त्यापैकीच एक होता, 'पुलोद'चा प्रयोग. देशात इंदिरा गांधीचा दरारा असताना शरद पवारांनी धाडस केलं आणि पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार स्थापन केलं. याच प्रयोगामुळं महाराष्ट्राला सर्वात तरूण मुख्यमंत्री मिळाला. आणखी वाचा- विधानसभेतून बाहेर काढणाऱ्या मार्शलला शरद पवार म्हणाले, आता आमदार होऊनच येणार… १९७८मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीचे निकाल त्रिशंकू लागले. आणिबाणीनंतर झालेल्या या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसबरोबरच रेड्डी काँग्रेसलाही फटका बसला. तर निवडणूक निकालात जनता पक्षाला सर्वाधिक ९९ जागा मिळाल्या. दुसरीकडं इंदिरा काँग्रेसला ६२, तर रेड्डी काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला १३, माकपला ९, आणि अपक्षांना ३६ जागा मिळाल्या होत्या. स्पष्ट बहुमत कुणालाही नव्हतं. मात्र, जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. जनता पक्षाला रोखण्यासाठी इंदिरा कांग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांनी आघाडी केली आणि मार्च १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते नासिकराव तिरपुडे यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणखी वाचा- शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेलं आंतरराष्ट्रीय मासिक मार्केटमध्ये दिसलंच नाही, कारण… पुढे सरकार सत्तेवर आले. पण, नासिकराव तिरपुडे यांनी वर्चस्व गाजवायला सुरूवात केली. याकाळात त्यांनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यामुळं वसंतदादा पाटील यांना सरकार चालवताना अडचण येऊ लागली. हे सगळं सुरू असताना शरद पवार ३८ आमदारांना घेऊन सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर अल्पमतात आलेल्या वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बाहेर पडलेल्या शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर शरद पवारांनी जनता पक्षाशी हातमिळवणी करून ‘पुलोद’ (पुरोगामी लोकशाही दल) चा राजकीय प्रयोग केला. यात समाजवादी काँग्रेस आणि जनता पक्षाबरोबर शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. केवळ ३८ आमदारांचं संख्याबळ असताना ‘पुलोद’च्या माध्यमातून शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अवघ्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपद सांभाळणारे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले.