यापूर्वीही चार वेळा ‘सर्जकिल स्ट्राईक’ केल्याचा शरद पवार यांचा दावा चुकीचा असून, भारताने अशाप्रकारे प्रथमच पाकिस्तानात जाऊन कारवाई केलेली असल्याने अशावेळी चुकीची विधाने करून आमच्या जवानांचा अपमान करू नये, अशी टीका महाराष्ट्र माजी सनिक संघटनेचे पदाधिकारी कॅप्टन (निवृत्त) उदाजीराव निकम यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

भारताने यापूर्वी चार वेळा ‘सर्जकिल स्ट्राईक’ केले असल्याच्या पवारांच्या विधानाचा समाचार घेताना कॅप्टन निकम म्हणाले, की पाकिस्तानविरुद्ध प्रथमच अशाप्रकारे अचूक कारवाई झाली आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा चांगला वापर करण्यात आला आहे. यामुळे त्याला भरीव यश आले आहे. अशा वेळी सैन्याच्या मागे उभे राहण्याऐवजी अशी विधाने करून राजकीय नेते त्यांचा अपमान करत आहेत. काश्मीरमधील उरी हल्ल्यामध्ये आमचे अनेक जवान धारातीर्थी पडले. याचे भारतीय सैन्याला शल्य होते. दरवेळी खोडी काढणाऱ्या या पाकिस्तानला तसेच कडक उत्तर देणे अपेक्षित होते. या पाश्र्वभूमीवर भारतीय सैन्याने प्रथमच पाकिस्तान हद्दीत घुसून तिथल्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवत अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले. भारतीय सैन्याची ही आजवरची सर्वात मोठी कामगिरी होती. अशा वेळी त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी ‘असे सर्जकिल स्ट्राईक यापूर्वीही आमच्या काळात आम्ही केले होते’ अशी कुचेष्टेची विधाने करणे अत्यंत चुकीचे आहे. अशा विधानांमधून आपण आमच्याच जवानांचे मनोबल खच्ची करत आहोत. हुतात्म्यांचा अपमान करत आहोत हेही या नेत्यांना ठाऊक नसते. ही सर्व विधाने पाहिली तर हे राजकीय नेते भारताच्या बाजूने आहेत, की पाकिस्तानच्या हेच कळेनासे झाले आहे. आजवरच्या सर्वोत्तम कामगिरीनंतरही ‘अशी कामगिरी पूर्वी केली होती’ असे सांगत जवानांच्या कामगिरीला अशा पद्धतीने कमी लेखणे सर्वथा चुकीचे आणि निषेधार्ह असल्याची टीका कॅ. निकम यांनी केली.