राज्यात सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाउनचा कालावधी वाढण्यात आलेला आहे. यामुळे उद्योग जगतवार याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे. हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्या शरद पवारांसमोर मांडल्या होत्या, या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं असल्याची माहिती, शरद पवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

कोविड-१९ ह्या जागतिक महामारीच्या दुसर्‍या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. करोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत मला अवगत केले. त्यांनी प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले. अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

तसेच, आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली करोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल, हा विश्वास मला आहे. असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

”एफएल-३ परवानाधारक हॉटेल-परमीटबार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान ४ हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज बिलात सवलत मिळावी तसेच मालमत्ता करात सूट मिळावी आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपतकालीन पतरेखा हमी योजना क्र. १.० व २.० अंलता आणून सदर योजनेला दिनांक ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच, पर्यटन-आदरातिथ्य व्यवसायांकरिता क्र. ३.० योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात देखील उद्योग – व्यवसायाला संजिवनी देणारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबवावी.” असे शरद पवारांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.