शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा इशारा
साखरेचे दर घसरले असताना ऊसदर ठरला, आता साखरेचे दर वाढल्याने साखर कारखान्यांच्या नफ्यात वाढ होणार असून, हा नफा ऊस उत्पादकाला मिळालाच पाहिजे. वाढीव ऊसदर मिळावा हा आमचा अधिकार असून, ऊसउत्पादकांच्या सर्व देण्यांबरोबरच वाढीव ऊसदरही मिळावा, दुधाला रास्त दर मिळावा यासाठी वेळप्रसंगी राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला.
सह्णााद्री साखर कारखान्याने थकवलेल्या प्रतिटन ९९ रुपये याप्रमाणे १२ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या प्रयत्नातून मिळाल्याबद्दल आनंदोत्सव व सचिन नलवडे यांचा सत्कार अशा कार्यक्रमात कराडनजीकच्या पार्ले येथे ते बोलत होते. ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सदाशिव नलवडे, अर्जुन साळुंखे, देवानंद पाटील, धनाजी शिंदे, सचिन नलवडे यांची उपस्थिती होती.
सदाभाऊ म्हणाले, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सततच्या संघर्षांमुळे उसाला चांगला भाव मिळत गेला. तरी शेतकऱ्याने सजग राहून आपल्या न्याय्य हक्कासाठी लढण्याची तयारी ठेवावी, रडणे बंद करून अन्याय करणाऱ्या साखरसम्राटांचे वर्चस्व उद्ध्वस्त करावे. उसाच्या कणाकणाचा हिशोब आम्ही शेतकऱ्यांना शिकवलाय. साखर उद्योगाचे राजकारण काय चालते हे समाजासमोर आणले आहे. त्यामुळे एकेकाळी आम्हाला तिष्ठत ठेवणारे साखरसम्राट आज आमच्यासाठी तिष्ठत उभे आहेत. शेतकरी स्वाभिमानी होत चालला असून, त्याचा हा बाणेदारपणा कायम राहिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सचिन नलवडे या आमच्या तरुण कार्यकर्त्यांने सह्णााद्रीच्या ऊसउत्पादकांना कारखान्याकडे थकीत असलेले १२ कोटी ८० लाख रुपये मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन आपला लढा यशस्वी केला आहे. तरी, सहकारात वतनदार झालेल्या हुकूमशाही विश्वस्तांना धडा शिकवा, न्याय्य हक्कासाठी लढय़ाची भूमिका कायम ठेवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. भ्रष्टाचारी साखर कारखानदारांची शासनाने गय करू नये. अन्यथा शेतकरी आपल्या पाठीशी कदापि राहणार नाही, असा इशारा खोत यांनी दिला.
राजू शेट्टी म्हणाले, की सारे राज्यकर्ते सारखेच असून, कारखानदारधार्जिणे आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या कृपेने आम्हाला आंदोलनासाठी स्मशानभूमीची जागा मिळाली. आमच्यावर सर्व ते गंभीर गुन्हे त्यांनी दाखल केले. अस्वलाच्या अंगावरील केस मोजता येतील, पण आमच्यावरील गुन्ह्णाांची संख्या सांगता येणार नसल्याचे नमूद करून त्यांनी आघाडी व युती शासनातील राज्यकर्त्यांवर सडकून टीका केली.