विधानसभा निवडणुकीत युतीचा अभूतपूर्व विजय होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाजनादेश यात्रा वर्ध्यात आहे त्याच दरम्यान पत्रकारांशी संवाद साधत असताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर भाजपातल्या मेगा भरतीवरही त्यांनी भाष्य केलं. भाजपाकडे  लिमिटेड जागा आहेत, त्यामुळे आम्ही सगळ्यांना घेऊ शकत नाही. काही लोक इच्छुक आहेत. काही लोकांचे प्रवेश होतील मात्र फार नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वर्धा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी विधानसभा निवडणुकीत युतीचा अभूतपूर्व विजय होईल असं म्हटलं आहे. महाजनादेश यात्रेला मिळणारा प्रतिसाद ही आम्ही पाच वर्षात केलेल्या कामांची पोचपावती आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले सगळेच लोक आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. मात्र आम्ही काहीजणांनाच प्रवेश दिला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. जागावाटपाबाबत आमचं म्हणजेच शिवसेना आणि भाजपा यांचं सगळं ठरलं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

येत्या पाच वर्षांच्या काळात आम्ही महाराष्ट्र दुष्काळमुक्त करु अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच कृष्णा नदीचे पाणी थेट बुलडाण्यापर्यंत आणू असंही त्यांनी स्पष्ट केलं. जागावाटपाबाबत राज्याला सगळे अधिकार दिले आहेत. आमच्या चर्चा सुरु आहेत यावर लवकरच तोडगा निघेल असंही त्यांनी म्हटलं आहे.