शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. यानंतर सोशल मीडियावर कंगनावर जोरदार टीका झाली. दरम्यान कंगनाने अजून एक ट्विट करत धमकावणाऱ्यांना थेट आव्हान दिलं. आपण ९ सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याचे सांगत कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला रोखून दाखवा असं कंगनानं म्हटलं होतं. तसंच कंगनानं आपण इस्लाम डॉमिनेटेड क्षेत्रात आपलं करिअर आणि जीव पणाला लावत झाशीच्या राणीवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट केल्याचा उल्लेखही केला होती. दरम्यान, आता शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी कंगना रणौतवर संताप व्यक्त केला आहे.

“खोट्या घोड्यावर बसत, दुसऱ्यानी लिहिलेले स्क्रिप्ट वाचल्याने कधी कोणी झाशीची राणी होत नाही. त्यासाठी कर्मभूमीवर खरी निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते. जी झाशीच्या राणीनी अखेरपर्यंत जोपासली. कुणालाही राणीची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही राम नाही,” असं बांदेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.

राऊतांनीही मांडली भूमिका

“भाजपाच्या काही नेत्यांच्या भूमिकांबद्दलही वाचन केलं. आशिष शेलारही म्हणाले कंगना राणौत यांनी मुंबईला अक्कल शिकवण्याची गरज नाही. त्यांनी हे अधिक जोरात बोललं पाहिजे. महाराष्ट्र हा त्यांचाही आहे. तेदेखील महाराष्ट्रात राजकारण करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एकाचे नाही. ते महाराष्ट्राचे संपूर्ण देशाचे आहेत. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशाप्रकारे टीपण्णी करत असेल तर तो विषय एखाद्या पक्षाचा शिवसेनेचा राहत नाही. तो राज्यातील ११ कोटी जनतेचा विषय आहे,” असंही राऊत म्हणाले. बॉलिवूडमधल्या अनेक बड्या कलाकारांनीही तिच्या वक्तव्याचा निषेध केला त्यांचंही मी अभिनंदन करतो असं ते म्हणाले.

हे आंदोलन केवळ शिवसेनेचं नाही. महाराष्ट्र, मुंबई ही केवळ शिवसेनेची आहे का? ती मराठी माणसाची आहे. महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या प्रत्येकाची ती आहे. शुक्रवारी सर्व पक्षीयांनी आंदोलन केलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील काल तिला सुनावलं. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब हेदेखील शुक्रवारी बोलले. जे काही सांगायचं आहे ती सरकारची भूमिका आहे. मीदेखील पक्षाच्यावतीनं जे काही बोलायचं ते बोललो. आता हा विषय संपवायला पाहिजे. जे काही करायचं ते सरकार करेलच असंही ते म्हणाले.