महाराष्ट्र एकीकरण समितीतील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावला तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे. गुरूवारी कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्याचा माने यांनी समाचार घेतला.

गेल्या ६४ वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो “कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ,” अशा आशयाची फेसबुक पोस्ट धैर्यशील माने यांनी शेअर केली आहे.

तसंच आजवर महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसं सांगावं, आजही महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील. पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. अशा बेजबाबदार विधानांनी शांतता भंग करू नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. अज्ञानातून केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो, असं ते म्हणाले.

काय म्हणाले होते भीमाशंकर पाटील?
भाषावार प्रांतरचनेदरम्यान कर्नाटकात अडकलेल्या मराठी भाषिकांना आणि हा लढा सुरू ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला असं वादग्रस्त वक्तव्य पाटील यांनी केलं होतं.