सध्या देशात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर, पोलीस कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता दिवसरात्र झटत आहे. अशा वेळीही काही समाजकंटकांकडून त्यांच्यावर हात उचलण्यासारखे किंवा शिवीगाळ करण्यासारखे प्रकार घडत आहेत. मुंबईतील कुर्ला पाईपलाईन येथे काही लोकांनी पोलिसांवर हात उगारल्याचा तसंच त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यावर बोलताना शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी अशा समाजकंटकांना भर चौकात चोप दिला पाहिजे, असं म्हटलं आहे. "पोलीस हे माझा अभिमान आहेत. पोलिसांवर कोणीही हात उचलू नये. काही मुस्लिम समाजातील समाजकंटक हे सतत हैदोस घालत आहेत आणि आपले पोलीस बांधव आपले कर्तव्य समजून सगळं निमुटपणे सहन करत आहेत," असं नांदगावकर म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी पोलिसांना मोकळे हात देण्याची विनंती सरकारकडे केली आहे. "एकीकडे जनतेची सेवा करताना करोनाची लागण होऊन काही पोलीस बांधव शहीद झाले. काही विकृत प्रवृत्तींमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या समाजकंटकांना वेळीच आवरलं पाहिजे. अन्यथा हे समाजकंटक करोनापेक्षाही घातक ठरतील," असं ते यावेळी म्हणाले. "ज्या मुस्लिम समाजातील समाजकंटकांना कायदा सुव्यवस्थेचं पालन करायचं नसेल ते पाकिस्तानात जाऊन का राहत नाहीत?" असा सवाल करत त्यांची महाराष्ट्राला गरज नसल्याचंही म्हटलं. "जे पोलिसांच्या वर्दीला हात लावतील त्यांना दिसता क्षणी चोप द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत," असं नांदगावकर या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.