‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’, या अमित शाह यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून आता शिवसेना-भाजपात शाब्दिक चकमकीस सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावट्यांच्या इशाऱ्यांना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच ‘पटकवले’ आहे, इतक्या लवकर हे विसरलात का, अशा थेट शब्दांत त्यांनी भाजपाला फटकारले आहे. या नव्या वाक्-युद्धामुळे युतीची अपेक्षा केलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांची धाकधुक वाढली आहे.

लातूर येथे रविवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीवरून शिवसेनेला इशारा दिला होता. शाह यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून प्रत्युत्तर येणार हे गृहीत धरले जात होते. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेनेही भाजपावर हल्लाबोल केला.

राऊत म्हणाले की, शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावटयांच्या इशारयाना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच “पटकवले” आहे. इतक्या लवकर विसरलात?

लातूर येथे बोलताना शाह यांनी स्वबळाचे स्पष्ट संकेत दिले. ‘युती होगी तो साथी को जितायेंगे नहीं हुई तो पटक देंगे’. मित्रपक्ष सोबत आला तर त्यांना जिंकवू अन्यथा त्यांचाही पराभवाची धुळ चारु. त्यासाठी प्रत्येक बुथवर तयारी सुरु करा, विजय आपलाच होईल, अशा सूचना त्यांनी दिली होती.