पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत पाकिस्तानविरोधात युद्धाची भूमिका मांडली. हल्ल्याचा निषेध करणे, बदला घेणे ही मोठी गोष्ट नाही. पण जेव्हा येणारी पिढी विचारणार की पाकिस्तान कुठे होता, त्यावेळीच बदल्याचा खरा आनंद मिळतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

पुलवामा येथे दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात ४१ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी ट्विट केले. हल्ल्याचा निषेध करणे, बदला घेणे ही मोठी गोष्ट नाही. पण जेव्हा येणारी पिढी विचारणार की पाकिस्तान कुठे होता यात बदल्याचा खरा आनंद मिळेल, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

दरम्यान, पुलवामावरील हल्ल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पाकिस्तानवर हल्ल्याची मागणी केली होती. या आधी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा अभिमान आहे. मात्र तो सर्जिकल स्ट्राइक आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला होता. ती लोकं आपल्या देशात घुसून घातपात घडवत आहे. जनतेच्या मनात संताप असून जनता सरकारच्या पाठिशी आहे, सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.