पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचा पदवीधारक असल्याबद्दल चौकशीची मागणी केलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीच माझ्यासह भाजपचे माजी मंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठातून घेतलेल्या पदव्यांबाबत चौकशी करावी, असे उत्तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.

मंत्री सामंत यांनी पदवी घेतलेले विद्यापीठ आणि संबंधित पदवी बोगस असल्याचा आरोप पुण्यातील माहितीचा अधिकार कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी रविवारी केला. त्या आधारे दरेकर यांनी याबाबत चौकशीची मागणी केली. या संदर्भात सामंत म्हणाले की, या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, काय उद्देश ठेवून हे आरोप करण्यात आले याची चौकशी करावी, अशी सूचना मी शासनाला करणार आहे. अशाच प्रकारचा आरोप भाजपचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावरही झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या दरेकर यांनीच माझी व तावडे यांचीही चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी दरेकर यांची एक सदस्यीय चौकशी नेमावी. ते पूर्ण पारदर्शी असल्यामुळे आमची चौकशी चांगल्या पद्धतीने करतील, आम्हाला न्याय देतील, असा टोलाही सामंत यांनी लगावला आहे.

होतकरू, गरीब विद्यार्थ्यांसाठी डॉ. मनोहर आपटे यांनी ही शिक्षण संस्था सुरू केली होती. स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता, त्यामुळे मी तेथे शिकलो. तेथून घेतलेली पदवी मी माझ्या पहिल्या, प्रतिज्ञापत्रापासून प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नमूद केली आहे. राज्यात अशा प्रकारे शिक्षण देणाऱ्या संस्थांचे हेतू आणि कार्यपद्धतीविषयी येत्या पंधरा दिवसात चौकशी करून माहिती घेतली जाईल आणि त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल, असेही सामंत यांनी जाहीर केले आहे.

काय आहे वाद?
मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठातील पदवीमुळे माजी उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजप विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झाले होते. आता जुनाच कित्ता महाविकास आघाडीच्या शासनानेही गिरवला असून नवनिर्वाचित उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

शासनाची मान्यता नसलेल्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये अशी आवाहने शासन करत असताना माजी उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांची अनधिकृत विद्यापीठातील पदवी वादग्रस्त ठरली होती. भाजप शासन २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर २०१५ मध्ये उघड झालेली तावडे यांच्या पदवीची बाब विरोधकांना अगदी २०१९ मधील निवडणुकांच्या प्रचारापर्यंत पुरली. आताचे सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या मुद्दय़ावर भाजपवर तोंडसुख घेतले होते. मात्र आता शिक्षणमंत्र्यांच्या वादग्रस्त पदवीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. तावडे यांनी ज्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली त्याच ज्ञानेश्वर विद्यापीठाचे सामंत हे विद्यार्थी आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.

सामंत यांनी अभियांत्रिकी शाखेचे पदविकाधारक (डिप्लोमा) असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. राज्य मंडळाची बारावीची परीक्षा मार्च १९९१ मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी डिसेंबर १९९५ मध्ये पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केले. ऑटोमोबाइल अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविकेचे शिक्षण त्यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून पूर्ण केले आहे. हे विद्यापीठ अनधिकृत आहे.

१९८० मध्ये स्थापना..
* डॉ. मनोहर आपटे यांनी १९८० मध्ये ज्ञानेश्वर विद्यापीठ सुरू केले. पुण्यातील एका सदनिकेत या विद्यापीठाचे कार्यालय होते.
* याला विद्यापीठ म्हणण्यात येत असले तरी ते फक्त संस्थेचे नाव आहे, त्याला विद्यापीठाचा दर्जा नाही असे या संस्थेनेच जाहीर केले होते.
* विद्यापीठाला आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात असे आठव्या नियोजन आयोगाच्या बैठकीत नमूद करण्यात आले होते.
* त्या वेळी डॉ. आपटे हेच नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. मात्र कोणत्याही शासकीय यंत्रणेची मान्यता न घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता.
* कोणत्याही कारणास्तव मुख्य प्रवाहात शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था असल्याची स्थापकांची भूमिका होती.