“भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरूनच वाढला आहे. कोणी कोणाचे फोटो वापरणं हा गुन्हा नाही,” असं मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

“देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श विरोधीपक्ष नेते म्हणून काम करावं. महाराष्ट्राला आदर्श विरोधी पक्षनेतेपदाची परंपरा आहे. अनेक दिग्गजांनी योग्यरित्या ही जबाबदारी पार पाडली. राज्यात भाजपानंच शिवसेनेचे उमेदवार पाडले, याची माहितीही आमच्याकडे उपलब्ध आहे,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं. “राज्यात आम्ही जर वेगळे लढलो असतो तर शंभरी गाठली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येकाला ज्या भूमिका मिळाल्या त्या निभवल्या पाहिजेत,” असंही ते म्हणाले.

“हे बैलगाडी सरकार किंवा ऑटोरिक्षा सरकार असेल तरी कोणाला कमी लेखू नये. आम्ही कोणत्याही परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही कासवाच्या गतीनं जाऊ पण टप्पा पार करू,” असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. “आम्ही कोणावरही व्यक्तीगत टीका करत नाही. आम्ही धोरणांवर टीका करतो. पण काही जणांकडून देशाच्या माजी पंतप्रधानांवरही टीका केली जाते. हा देश गेल्या पाच वर्षांमध्ये उभा राहिला नाही. गेल्या ६० वर्षांमध्ये करण्यात आलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा देश उभा राहिला आहे. काँग्रेसचं देशाच्या विकासात मोलाचं योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आमच्या मनात आदर आहे आणि तो यापुढेही राहिल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. “आता कोणीही कोणासाठी दरवाजे उघडू नये. जेव्हा दरवाजे उघडायला हवे होते, तेव्हा ते उघडण्यात आले नाहीत. आता ती वेळ निघून गेली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“जनतेने जनादेश आम्हाला दिला, मात्र शिवसेनेने फारकत घेतली आणि मोडतोड करुन सरकार स्थापन केलं. शिवसेना जे काही वागली त्याला काहीही अर्थ नव्हता.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. ” राष्ट्रवादीचे अजित पवार आमच्याकडे आले होते. आम्ही कोणत्याही नेत्याकडे गेलो नव्हतो. ते आले त्यांनी आम्हाला समर्थनाचं पत्र दिलं. अजित पवारांना सोबत घेऊन शपथविधी हा आमचा गनिमी कावा होता. तो फसला, हे आम्हाला मान्य आहे. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, ते बाहेर पडले,” असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.