शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे रविवारी दिवसभर विरोधकांच्या निशाण्यावर राहिले. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर…कंगना रणौतवर टीका करताना संजय राऊतांनी तिचा उल्लेख हरामखोर मुलगी असा केला. यावरुन सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांनी संजय राऊतांना चांगलंच धारेवर धरलं. अनेक सेलिब्रेटींनी राऊतांनी माफी मागावी अशी मागणी केली. विरोधी पक्षातील भाजपाने सुशांत प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा सूचक शब्दांत संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं आहे.

अवश्य वाचा – ….मूँह काला कर चुके है ! मनसेच्या अमेय खोपकरांचा संजय राऊतांना टोला

१०५ आमदार असूनही विरोधी पक्षांमध्ये जाऊन बसलेल्यांना माझी ताकद काय आहे हे विचारा…जय महाराष्ट्र ! असा संदेश आपल्या फेसबूक अकाऊंटवर लिहीत संजय राऊतांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत आणि शिवसेना नेते यांच्यात चांगलचं वाकयुद्ध रंगलं आहे. मुंबईत येऊन मराठी माणूस आणि मुंबई पोलिसांविरोधात अपशब्द खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली होती. मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं होतं. कंगना रणौतची माफी मागण्याच्या प्रश्नावरही संजय राऊतांनी कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी देखील तिची माफी मागण्याचा विचार करेन असं म्हटलं होतं. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये याप्रकरणी नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – तुफानों का रूख…! संजय राऊतांच्या ट्विटवर संबित पात्रा म्हणतात…