जालना :  लोकसभा निवडणुकीतही भाजपा-शिवसेना युतीचा फॉम्र्युला ठरलेला आहे. आता फक्त बसायचे आणि घोषणा करायची एवढेच बाकी आहे. परंतु युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. आम्ही युतीसाठी तयार आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले.

‘लोकसत्ता’शी बोलताना दानवे म्हणाले,की  युतीबाबतचा नवा प्रस्ताव असे काही नाही. फॉम्र्युलाचे स्वरूप ठरलेले आहे. त्यांनी किती लढल्या होत्या आणि आम्ही किती लढल्या होत्या, हे सर्वाना माहीत आहे. शिवसेना-भाजपची युती २५ वर्षांपासून आहे. मागील विधानसभा फक्त आम्ही स्वतंत्ररीत्या लढलो होतो. लोकसभाही एकत्र लढलो होतो. निवडणुकीसाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळावे, या मताचे आम्ही आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करीत राहू. आम्हाला युती करायची असल्याने आमची रणनीती झाकून ठेवलेली नाही.

उद्धव ठाकरे दुपारी मुख्यमंत्र्यांवर टीका करतात आणि रात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात, असे जे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे, त्यास अर्थ नाही. जनतेच्या कामासाठी कुणीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकते. जयंत पाटीलही भेटतात. शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये एकत्रितरीत्या निर्णय घेतात. मतभेद असले तर सरकारमध्ये नाही, तर ते बाहेर आहेत. दानवे यांना रडण्याची वेळ येईल, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या बुधवारी जालना येथे केले होते. त्या संदर्भात दानवे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत मी प्रतिस्पध्र्यास चारीमुंडय़ा चीत करीन. खासदार संजय राऊत यांनी भाजपविषयी काय भाषा वापरावी, हा त्यांचा प्रश्न आहे. आमची मात्र आगामी निवडणुकीत युतीची इच्छा आहे, असेही दानवे म्हणाले.