कोणत्याही एका पक्षाचे सरकार येईल असा काळ आता राहिला नाही. भाजपाचे राजकारण राज्याच्या आणि देशाच्या हिताचे नाही, त्यामुळे त्यांना बाजूला ठेवणे ही काळाची गरज होती. त्यांच्यापेक्षा मराठी बाणा दाखवणारी शिवसेना लाख पटीने चांगली. शिवाय घटनेच्या चौकटीत राहून राज्यकारभार करण्याचा विश्वास शिवसेनेने दिल्याने आम्ही त्यांना साथ दिली आणि महाविकास आघाडीचे सरकार आले, असे प्रतिपादन करत मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यात घडलेल्या नाटय़मय घडामोडींवर प्रकाश टाकला.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्याच दिवशी सायंकाळी थोरात मुंबईला गेले होते. महिनाभरातल्या नाटय़मय घडामोडींनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि त्यात थोरात यांचा मंत्री म्हणून समावेश झाला. त्यानंतर प्रथमच थोरात आपली मायभूमी संगमनेर येथे काल आल्याने त्यांचे भव्य स्वागत करत नागरी सत्कारही करण्यात आला. यशोधन कार्यालयाच्या शेजारील मैदानात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार किरण लहामटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कांचनताई थोरात, अशोकराव भांगरे, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर, यांच्यासह जिल्हा आणि राज्यभरातून आलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, तालुक्यातील जनतेचे अलोट प्रेम आणि पाठिंब्याच्या जीवावर आपण सलग आठव्यांदा विधानसभेत पोहोचलो. परंतु यापूर्वी कधीही पाहिला नव्हता असा काळ निकालानंतरच्या महिना भरात अनुभवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी दाखवलेला मराठी बाणा आणि धाडसाचे कौतुक केले पाहिजे. वास्तविक आम्ही विरोधात बसण्याची तयारी केली होती, परंतु शिवसेनेने प्रस्ताव दिल्याने आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनुकूलता दर्शविल्याने आघाडीचे पाऊल पुढे पडले. अशाही स्थितीत दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींचे मन वळवणे ही बाब सोपी नव्हती. मात्र सामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी पूर्णत: घटनेच्या चौकटीत राहून राज्यकारभार चालवण्यावर तिनी पक्षांचे एकमत झाल्याने त्यात यश आले.  लोकसभेसाठी आमदार कांबळे यांना खूप मदत केली मात्र त्यांनी काहीही न सांगता दुसरीकडे गेले आणि तिथे लहू कानडे आमदार झाले. अकोलेतही असेच घडले.  आता परिस्थिती बदलली आहे. जे पक्ष सोडून गेले त्यांची जागा आता नवीन लोकांनी घेतली आहे. त्यामुळे अशा लोकांना पक्षात घेताना नवीन लोकांची अनुकूलता असेल तरच विचार करू. निळवंडे धरण आपण पूर्ण केले आणि आता त्याचे कालवे करण्याची जबाबदारीही आपलीच आहे, याची आपल्याला जाणीव असल्याचेही ते म्हणाले.

संगमनेरकरांनी केलेल्या अभूतपूर्व स्वागताने आपण भारावून गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार यावे ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा होती. आघाडी होण्यात थोरातांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता चांगले सरकार देण्याची जबाबदारी महाआघाडीवर असून ती पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वश्री हिरालाल पगडाल, शंकर खेमनर, अमर कतारी, सचिन गुजर, अशोक खांबेकर, प्रशांत वामन, मुंडे आदींची भाषणे झाली. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन तर निखील पापडेजा यांनी आभार मानले.

भाकर, ठेचा आणि पिठलं!

कोणताही दगाफटका होऊ  नये म्हणून पक्षाचे आमदार जयपूरला हॉटेलमध्ये ठेवले होते. त्यामुळे एकाच वेळी मुंबई, जयपूर आणि दिल्ली अशा तीन आघाडय़ांवर आपल्याला लढावे लागले. हॉटेलमध्ये आमदार आरामात असतील असे आपल्याला वाटत होते. मात्र अनेक आमदारांचे काही दिवसात पोट बिघडले. त्यांच्या मागणीवरून बाजरीची भाकरी, मिरचीचा ठेचा आणि पिठलं खायला दिल्यानंतर मात्र त्यांची तब्येत सुधारली. त्यांच्या या वक्तव्याने चांगलीच खसखस पिकली.

एकदाचे ग्रहण सुटले!

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने उशिरा उमेदवार जाहीर केल्याने आमचा पराभव झाला. मात्र पुढील निवडणुकीत याची दुरुस्ती करू. आता जिल्ह्यला लागलेले ग्रहण एकदाचे सुटले असल्याची टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी माजी मंत्री विखे यांचे नाव न घेता केली. तर संगमनेरच्या विकासासाठी आम्ही तालुका दत्तक घेऊ  अशी वल्गना आमच्याकडच्या नेत्याने केली होती. आता विखेंचा राहाता तालुकाच मंत्री थोरातांनी दत्तक घ्यावा असा टोला डॉ. गोंदकर यांनी हाणला.