नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देलीत, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी औरंगाबाद येथे दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी अशोक चव्हाण औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारलं असता अशोक चव्हाण म्हणाले की, ” माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयात मला काही बोलायचे नाही. पण त्यांनी केलेल्या विधानांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. त्यांची किंमत काय आहे. विषय शिवसेनेचा आहे. शिवसैनिकच योग्यवेळी त्यांना उत्तर देतील कारण ते पूर्वश्रमीचे शिवसैनिक आहेत, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.”

आणखी वाचा- …नाहीतर मातोश्रीची आतली माहिती बाहेर काढेन, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आरक्षण टिकावे आणि सुनावणी पूर्ण घटनापीठासमोर व्हावी, अशी राज्य सरकारचीही भूमिका आहे. मंगळवारी (ता. २७) सुनावणी आधीच्या बेंचसमोर होणे सरकारला अपेक्षीत नव्हते. ती संविधानिक बेंचसमोर व्हावी, अशी विनंती सरकारच्या वतीने करण्यात येणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

काय म्हणाले होते राणे ?
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा भाजपा खासदार नारायण राणे यांनी सडकून टीका केली होती. राणे म्हणाले की, दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे कुठलाही ताळमेळ नसलेली निर्बुद्ध, शिवराळ बडबड होती. असं भाषण यापूर्वीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं.मुख्यमंत्री म्हणून एकवर्ष व्हायला आलं. त्यांनी राज्यामध्ये केलेल्या विकास कामाचा उल्लेख केला नाही. शेतकरी, शिक्षणाचे प्रश्न, राज्याची अर्थव्यवस्था याबद्दल काहीही बोललेले नाहीत.

आणखी वाचा- सुशांतच्या खुनाच्या आरोपाखाली आदित्य ठाकरे गजाआड जाणार – नारायण राणे

राज्य आज दिवाळखोरीच्या उंबरठयावर आहे. जनाची नाही, तर मनाची वाटली पाहिजे. कोणाबद्दल काय बोलावं हे कळत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाला लायक नाही. पंतप्रधानांबद्दल त्यांच्या कामाबद्दल बोलण्याची मुख्यमंत्र्यांची योग्यता नाही, असे नारायण राणे म्हणाले.

आमच्याकडे नजर फिरवू नका, पळताभुई थोडी होईल. बेडूक एका दिशेने जातो, गांडुळ दोन्ही बाजूंनी फिरतो. मातोश्रीचा इतिहास बाहेर काढेन असा इशारा नारायण राणे यांनी दिला.