गुजरातमधील निकालांनी जनमत बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. पुढे काय ते येणारा काळ ठरविल, पण राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असून सन २०१९ च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा आमचा निर्धार असल्याचे वक्तव्य केंद्रिय अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गिते यांनी शनिवारी महाड येथे पत्रकारांशी बोलताना केले. राज्यामध्ये जरी शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव असला तरी केंद्रात आम्ही (शिवसेना आणि भाजपा) एनडीए म्हणूनच निवडून आलेलो असल्यामुळे केंद्रात आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव नसल्याचेहि त्यांनी यावेळेस सांगितले.

शनिवारी महाडच्या दौरयावर आलेल्या ना. अनंत गीते यांनी  वेळात वेळ काढून पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.

आम्ही सत्तेत असू किंवा नसू सरकारवर अंकूश ठेवण्याचे काम शिवसेना करेल असे धोरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले होते. १९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार असताना त्यांनी त्याच पध्दतीने काम केले आणि आता उध्दव ठाकरे सरकारवर अंकूश ठेवण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे ते म्हणाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच आम्ही त्या निवडणुकीचे रणिशग फुंकले आहे. रोहा येथे आयोजित केलेला निर्धार मेळावा त्याचाच एक भाग होता. असेच निर्धार मेळावे रायगड जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन येथेहि घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना दिलेल्या वचनाप्रमाणे विकासात कमी पडणार नाही. खासदार म्हणून आपण आपल्या मतदार संघात अनेक विकास कामे केली आहे. पंतप्रधान सडक योजनेतून अनेक रस्त्याची कामे मार्गी लावली आहेत. खासदार निधीचा शंभर टक्के विनियोग आपण केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेबद्दल केवळ आपल्याच मतदार सघात नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले.

पुन्हा लोकसभेमध्ये अनंत गीते विरूध्द सुनील तटकरे अशी लढत होईल का, असे विचारले असता त्यांनी निवडणूक लढवायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण मागच्या निवडणुकीचा अनूभव विचारात घता, सुनील तटकरे हे पुढील लोकसभा लढविण्याचे धाडस दाखवितील असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई- गोवा महामार्गाचे इंदापूर ते झाराप दरम्यानचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पनवेल ते इंदापूर दरम्यानचे काम वादात अडकले आहे. मात्र पनवेल ते वडखळ दरम्यानचे काम जे.एम. म्हात्रे हे करीत असून ते हे काम वेगाने आणि चांगल्या पध्दतीने करत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी पंतप्रधान सडक योजना नवयाने सुरू होत असून, त्यामध्येहि आपण काही रस्ते प्रस्तावित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महाड येथे लवकरच एका बठकीचे आयोजन करण्यात येईल आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल असेही ना. गीते यांनी यावेळेस सांगितले.