वडार समाजातील चार प्रमुख संघटनांनी आपसातील वाद मिटवत भारतीय वडार समाज संघटनेची स्थापना केली. यासंदर्भात नगरमध्ये झालेल्या बैठकीत संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिवाजी शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. संघटना भारतीय जनता पक्षाकडे विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात ५ जागांची मागणी करणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने गेली २० वर्षे खोटी आश्वासने देत समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत रामदास पाटील (उपाध्यक्ष, उस्मानाबाद), बाबाराव हुलगंडे (सचिव, नगर), बबनराव मोहिते (कार्याध्य्क्ष, मुंबई) यांचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी भीमाशंकर आनंदकर (सोलापूर), राज्य उपाध्यक्षपदी बंडू देवतळे (वर्धा) व वसंत आलकुंटे (बीड) यांची निवड करण्यात आली.भाजपकडे राज्यात नगरसह मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, पुणे व वर्धा येथे समाजासाठी जागा मागितल्या जाणार असल्याची माहिती शेलार यांनी पत्रकारांना सांगितले. समाजाचे कर्नाटकमध्ये १४ तर आंध्र प्रदेशात ७ आमदार आहेत. महाराष्ट्रात समाजाची लोकसंख्या ७० ते ८० लाख असूनही कोणत्याही राजकीय पक्षांनी समाजाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही, असाही आरोप त्यांनी केला. वडार समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, शिक्षण व नोकऱ्यात सवलत देऊन आर्थिक उन्नतीसाठी सवलती मिळाव्यात, समाजातील सुशिक्षितांच्या रोजगारासाठी व व्यवसायासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे आदी मागण्यांसाठी लवकरच आचारसंहितेपूर्वी शिर्डी येथे मेळावा आयोजित केला जाणार आहे. मेळाव्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहावे यासाठी आ. पंकजा मुंडे-पालवे व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत, असेही शेलार यांनी सांगितले.काँग्रेस व राष्ट्रवादीने खोटी आश्वासने दिली. शरद पवार यांनी संघटनेला निधी देऊन आपसात भांडणे लावली. आता राज्यातील इतरही संघटनांना एकत्र करणार असल्याचे आनंदकर म्हणाले.