विश्वास पवार, वाई

माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्याने सातारा जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसची सारी समीकरणे बदलणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले पक्षात असून नसल्यासारखे अशी अवस्था असताना शिवेंद्रसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने साताऱ्यात राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे ठाकले आहे. पक्ष नेतृत्वाने खासदार उदयनराजे यांना झुकते माप दिल्यानेच शिवेंद्रसिंह यांनी शेवटी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिन्ही राजांमध्ये मागील पाच वर्षे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि टोकाचा संघर्ष सुरू आहे. यामुळे अंतर्गत संघर्षांला कंटाळून शिवेंद्रसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि शिवेंद्रसिंहराजे एक विचाराने चालत असतात. दोघांसाठी खासदार उदयनराजे हे समान विरोधक होते. शिवेंद्रसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी उदयनराजे आणि रामराजे हे दोघे एकत्र येण्याची शक्यता नाही.

साताऱ्याच्या राजकारणात खासदार उदयनराजे भोसले यांनी मागील पाच वर्षांत आपले चुलत बंधू शिवेंद्रसिंह यांच्या विरोधात कायम कुरघोडय़ा केल्याचा आरोप आहे. दैनंदिन कामकाजात अडथळा आणणे तालुकानिहाय आमदारांच्या विरोधातील लोकांना भेटणे, त्यांना ताकद देणे, आमदारांच्या विरोधात जाहीर वक्तव्य करणे, तिथल्या कामात ढवळाढवळ करणे, जिल्ह्य़ातील सहकारी संस्थांबाबत उलटसुलट वक्तव्य करणे यामुळे शिवेंद्रसिंह कंटाळले होते. वेळोवेळी या आमदारांनी शरद पवारांकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र शरद पवारांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली जाते.

सातारा पालिकेत व लोकसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले व उदयनराजे भोसले यांचे मनोमीलन होते. नगरपालिका निवणुकीत आघाडी करू आणि उमेदरवार ठरवू असे उदयनराजेंच्या गोटातून शिवेंद्रसिंहराजेंना सांगण्यात येत होते, परंतु ऐनवेळी उदयनराजेंनी परस्पर निवडणुकीचे पॅनल व उमेदवार जाहीर करून टाकले. यावेळी साताऱ्याचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते व या जागेवर शिवेंद्रसिंहराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची शिवेंद्रसिंहराजेंची मागणी होती. उदयनराजेंनी त्यांना बेसावध ठेवत नगराध्यक्षपदासाठी माधवी कदम यांचे नाव सुचविले व त्यांना निवडून आणले. याच पालिका निवडणुकीत प्रचारादरम्यान उदयनराजे यांनी विधानसभा निवडणुकीत विधानसभेला यावेळी साताऱ्यातून सर्वसामान्य माणूस आमदार झालेला असेल असे वक्तव्य करून सर्वानाच आश्चर्यचकित करून टाकले होते. इथूनच त्यांच्यातील संघर्ष वाढत राहिला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी सुरुची बंगल्यावर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांची गोंधळ, मारामारी झाली. यानंतर दोन्ही गटातल्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. उदयनराजे यांच्यावर लोणंद येथे सोना एलाईज कंपनीने खंडणीचा गुन्हा दाखल केला यामागे रामराजे असल्याचा समज उदयनराजेंचा होता. या दोन वर्षांत अनेक वेळा साताऱ्यात राजांच्यातील वाद नेहमीच होत राहिला या सर्वाकडे पक्ष पातळीवर शरद पवारांनी लक्ष देणे गरजेचे होते. वेळोवेळी हस्तक्षेप करून या बाबी थांबविणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही. मी खासदार आहे मला जिल्ह्य़ाच्या राजकारणात सहकारी संस्थांच्या व स्थानिक सहकारी संस्थांच्या निवडणुकीत विश्वसात घेतले जात नाही. रामराजे व शिवेंद्रसिंह दोघे आमदारावर दबाव आणून त्यांना हवे तसे करतात, त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही अशी उदयनराजेंची तक्रार होती.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी फलटणला जाऊन उदयनराजेंनी रामराजेंच्या विरोधात शेरेबाजी केली होती. तर सातारा शहरात शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात कुरघोडय़ा केल्या.   शरद पवारांकडून उदयनराजेंना झुकते माप मिळत असल्याने शिवेंद्रसिंह नाराज होते. त्यामुळे योग्य संधीची व पर्यायाची वाट पाहत शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.