नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी प्रस्ताव मान्य झाला असल्याची माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पुढची कारवाई पूर्ण करुन मागणी पूर्ण केली जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपाचा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव मोडीत काढत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महार्गाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. "मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात यावा असा प्रस्ताव ठेवला. सर्वांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांचं महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचं योगदान आहे. बाळासाहेबांच्या संकल्पेतून गडकरींच्या मार्गदनाखाली मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तयार झाला होता. त्यामुळे गेमचेंजर ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्यावं अशी आमची भावना होती," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी देण्यात आली आहे. सुमारे ५६ हजार कोटी रूपये खर्चाच्या आणि मुंबई—नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदननिर्बंध, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्यमंतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे.या प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर होऊन प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. आणखी वाचा- आरे कारशेड पाठोपाठ आता मुंबई-पुणे हायपरलूपलाही स्थगिती? हा प्रकल्प शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असल्याचा आरोप करीत अगोदर त्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेने या प्रकल्पास बाळासाहेब ठाकरेचे नाव देण्याची मागणी केली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री(सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत तसेच काही आमदारांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या महामार्गास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर या महामार्गाच्या नामांतरावरून युतीमधील बेबनाव उघड झाला होता. देशातील पहिल्या वहिल्या मुंबई— पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढही बाळासाहेबांनी रोवली होती. त्यामुळे देशातील या पहिल्या द्रुतगती महामार्गाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाचा, त्यांच्या दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गास बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. आणखी वाचा- उद्धव ठाकरे उद्या शिवनेरी गडावरुन करणार शेतकरी कर्जमाफीची घोषणा? त्यावर या मार्गाला अटलजींचे नाव देण्याची घोषणा आपण यापूर्वीच केली आहे. अशा वेळी नको तो वाद कशाला निर्माण करता? अशाप्रकारे दबावाचे राजकारण खेळू नका अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना सुनावले. तेव्हा फडणवीस आणि सेना नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दीक वादानंतर या महामार्गास ठाकरेचे नाव न दिल्यास राजीनामा देण्याचा इशाराही शिवसेनेच्या मंडळींनी दिला होता. त्यानंतर नामांतराचा वाद दोन्ही पक्षांनी बाजूला ठेवला होता. आता सत्तांतर होताच या महामार्गास ठाकरेंचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. ५६ हजार कोटींचा खर्च सुमारे ५६ हजार कोटी रुपये खर्चाच्या आणि मुंबई-नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तब्बल १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्य़ांतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे. या प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर होऊन प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.