शिवसैनिकाची यवतमाळ ते तुळजापूर सायकलवारी

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम असल्याने स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्येही अस्वस्थता परसली आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजा भवानीला साकडे घालण्यासाठी एक शिवसैनिक गुरुवारी येथून तुळजापूरसाठी सायकलने रवाना झाला.

शिवसेनेचे उपशहर प्रमुख गिरीश व्यास यांच्या या सायलकवारीस शिवसेना नेते आ. संजय राठोड यांनी सकाळी भगवा झेंडा दाखवून रवाना केले. राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, त्यातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे ही सामान्य जनतेची भावना आहे. शिवसेनेचे नेते आ. संजय राठोड यांनी जिल्ह्यच्या विकासात गेल्या पाच वर्षांत दिलेले योगदान लक्षात घेऊन पक्षाने त्यांना यावेळी कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, शिवसेनेच्या रूपाने राज्यात बळीराजाचे राज्य यावे आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, अशी प्रार्थना तुळजा भवानीच्या चरणी करून साकडे घालणार असल्याचे व्यास यांनी यावेळी सांगितले. यवतमाळ ते तुळजापूर हे ४०० किलोमीटर अंतर गिरीश व्यास हे एकटेच सायकलने पूर्ण करणार आहेत.