मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत राज्यात सध्या करोनाच्या पार्श्वभुमीवर काय परिस्थिती आहे याची माहिती दिली. यावेळी त्यांनी जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन करत चिंता करा पण घाबरुन जाऊ नका असं आवाहन केलं. तसंच मुंबई-पुण्यात घरोघरी चाचण्यांची संख्या वाढवतोय. जलद चाचणी, वैद्यकीय उपकरणे आम्ही प्रमाणित करून घेतोय शी माहिती देताना सध्या ८० जण बरे होऊन घरी गेले असून ६४ मृत्यू झाले असल्याचं सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे –

१) करोनाच्या लढाईत आरोग्य यंत्रणा, पोलीस अहोरात्र काम करताहेत पण प्रथमच मी आपल्या यंत्रणेतील सर्व विभागांना धन्यवाद देतोय.

२) मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व जण मास्क लावून बसलेले छायाचित्र आपण पाहिले असेलच. ही पहिली अशी व्हिडीओ कॉन्फरन्स होती. सर्व मंत्र्यांनी एकमेकांत अंतर पाळले होते, मात्र मानसिकदृष्ट्या आम्ही एक होतो आणि आहोत. करोनाचा मुकाबला करण्यासाठी एक टीम म्हणून त्यांनी बऱ्याच सुचना केल्या आहेत.

३) मला कल्पना आहे कोरोनाचा रुग्ण आपल्या राज्यात  सापडून आता ४ आठवडे पूर्ण झाले. आपल्याकडे रुग्णांचे आकडे वाढताहेत ही वस्तुस्थिती आहे. चिंतेची बाब असली तर घाबरून जाऊ नका. आपण सर्व ताकदीनिशी प्रयत्न करत  आहोत. आपल्याकडे मला रुग्णांमध्ये थोडीशीही वाढ नको असे मी सांगितले आहे. करोना आपल्यामागे लागला आहे पण आपण ही सर्व जण कोरोनाच्या मागे “हात धुवून” लागलो आहोत.

४) लॉकडाउनमुळे आपली गैरसोय होते आहे. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पण हे युद्ध जिंकायचे असेल तर आपली घरे हेच गड किल्ले आहेत असे समजा. घरातले वातावरण आनंदी ठेवा.

५) माझे टीव्ही वाहिन्यांना देखील आवाहन आहे की, करोनाच्या बातम्या तर आहेतच. पण नागरिक तणावमुक्त राहतील आणि वातावरण हलकेफुलके राहील असे कार्यक्रम दाखवा

६) ज्यांना ज्यांना ह्रदयविकार, मधुमेह, स्थूलपणा आहे त्यांनी अधिक काळजी घ्या. बंधने ठेवा, कारण हे सर्व हाय रिस्क ग्रुप मध्ये आहेत्. घरी राहा पण तंदुरुस्त रहा

७) योगासने, हलके  फुलके व्यायाम करा. कारण हे युद्ध आपण जिंकणारच आहोत पण  पण यानंतरचे युद्ध घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेशी आहे. त्यासाठी आपली पूर्ण ताकद, हिंमत लागणार आहे.

८) जगभरातल्या बातम्या येत आहेत. अमेरिका, जपान, सिंगापूर येथील आकडा वाढतोय पण कालच बातमी आली की चीनच्या वूहानमध्ये निर्बंध आता उठवण्यात आले आहेत. ही दिलासा देणारी बातमी आहे. त्यांना यासाठी ७०-७५ दिवस लागले. आपण जर असाच दक्षतेने सामना केला तर आपल्याकडे देखील ही परिस्थिती बदलेल. मला खात्री आहे, आपण निश्चित बाहेर पडणार .

९) जे गरीब आहेत, गरजू आहेत त्यांच्यासाठी आपण राज्यात शिव भोजनाची सोय केली आहे. निवारा केंद्रात ६ लाख लोकांना दिवसांतून दोन वेळेस जेवण, नाश्ता देत आहोत. माणुसकी हाच एक धर्म आहे जो आम्ही पळत आहोत.

१०) केशरी शिधापत्रिकाधारक मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी ३ किलो गहू ८ रुपये किलो दराने व २ किलो तांदूळ १२ रुपये किलो दराने देण्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे. मी पंतप्रधानांना यासंदर्भात किमान आधारभूत किंमतीत धान्य यासाठी मिळावे अशी विनंतीही केली आहे.

११) केंद्राने जाहीर केलेल्या मोफत धान्याचे वाटपही सुरु झाले आहे. केंद्राचे चांगले सहकार्य मिळते आहे

१२) मास्क, पीपीई किट्सचा तुटवडा जगभर आहे. आता आपल्या देशात महाराष्ट्र, गुजरातमध्ये व्हेंटिलेटर बनविणे सुरु आहे. पीपीई कीटसारख्या काही गोष्टी आपण बनवत आहोत. सर्व सुविधा वाढवतोय पण रोगाचे स्वरूप लक्षात घेता या सुविधा, उपकरणे प्रमाणित असणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे

१३) आपण जर वस्तूंसाठी घराबाहेर पडणार असाल तर पुढचे काही दिवस मास्क वापरले पाहिजेत. त्यात गैर काहीच नाही. घरातल्या स्वच्छ कापडाने चेहरा कव्हर करता येऊ शकतो. पण छत्रीसारखा तो घरातल्या सर्व सदस्यांनी एकच वापरायचा नाही. वापरलेले मास्क कचऱ्यात तसेच फेकून न टाकता काळजीपूर्वक आणि सुरक्षित जागा पाहून जाळून टाका.

१४) फिव्हर क्लिनिक आम्ही सुरु केले आहेत  तिथेच आपली तपासणी करा.

१५) कोविड उपचारासाठी आम्ही रुग्णालयांची विभागणी केली आहे. ज्यांना सौम्य लक्षणे असतील, मध्यम स्वरुपाची तसंच करोना शिवाय इतरही रोग असतील अशा तीन रुग्णालयांची विभागणी केली असेल. त्यात निष्णात डॉक्टर असतील.

१६) निवृत्त सैनिक आहेत, ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे. अनेक वोर्ड बॉय,  निवृत्त परिचारिका, वैद्यकीय सहायता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती ज्यांना सध्या काम मिळालेले नसेल  त्यांना सहभागी करून घेणार आहोत. त्यांना मी आवाहन करतोय की महाराष्ट्राला आपली गरज आहे. केवळ अशांनी Covidyoddha@gmail.com या इमेलवर आपली माहिती द्यावी.

१७) मुंबई-पुण्यात घरोघर चाचण्यांची संख्या वाढवतोय. जलद चाचणी, वैद्यकीय उपकरणे आम्ही प्रमाणित करून घेतोय. आजमितीस ८० जण बरे होऊन घरी गेले आहे. ६४ मृत्यू झाले आहेत.