राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युद्धपातळीवर रुग्णालयं उभारण्यासाठी लष्कराकडून मार्गदर्शन घेण्याची आपली तयारी होती असं सांगितलं आहे. आपल्याला युद्ध पातळीवर रुग्णालयं उभारली पाहिजेत असं मी आधीपासूनच सांगत होतो. लष्कराला बोलवायचं नाही, पण त्यांची मदत घेण्याची तयारी होती असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं की, “मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करोनाना पहिला रुग्ण सापडला. एका पर्यटकांच्या ग्रुपसोबत तो गेला होता. ते सर्व दुबईतून आले होते. परदेशातून येणाऱ्यांची जी यादी दिली होती, दुबईचं नाव त्यात नव्हतं. पण आपण ताबडतोबत पाऊलं उचलली होती. सामूहिक सोहळे, मॉल्स, स्टेशन बंद केली. आपल्याला युद्ध पातळीवर रुग्णालयं उभारली पाहिजेत असं मी आधीपासूनच सांगत होतो. त्यासाठी लष्कराचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं माझं मत होतं”.

“मी लष्कराच्या धर्तीवर रुग्णालयं उभारण्यास सुरुवात करा असं सांगितलं होतं. अनेकांना आपण इथपर्यंत जाणार नाही असं वाटलं होतं. आता आपण अनेक ठिकाणी तसंच राज्यात जिथे गरज लागेल तिथे मोठी रुग्णालयं उभारण्यास सांगितलं आहे. गरज लागल्यास ते वापरावे लागतील,” असं सांगितलं आहे.

“विमानतळावर घेण्यात आलेली चाचणी चुकीची होती. केवळ ताप आहे का हे तपासणं खूप ढोबळ होतं. पूर्ण चाचणी केली जावी असा माझा तेव्हाही आग्रह होता,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. “केंद्रावर टीका करण्याची कोणतीही इच्छा नाही. लॉकडाउन जाहीर झाला तोपर्यंत मुंबई-पुण्यातील आपलीच बरी लोक बाहेरुन आली आणि आपापल्या वस्त्यांमध्ये गेली,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. लॉकडाउन अचानक उठवणं योग्य की आयोग्य हा विचार करावा लागेल असं त्यांनी म्हटलं आहे.

“लॉकडाउन घोषित झाल्यानंतर लोकांचा गोंधळ झाला. त्यामुळे मला रात्री निवेदन देत लोकांना दुकानं, जीवनाश्यक गोष्टी सुरु राहितील असं सांगावं लागलं. मी मोदींना तुमचं नाव घेऊन जनतेला आवाहन करणार असल्याचं सांगितलं होतं,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

“८० टक्के रुग्णांमध्ये करोनाची लक्षणं नाहीत. अनेक रुग्ण कोणत्याही औषधाविना बरे झाले आहेत. एकीकडे दिलासा असला तरी हे धोकादायकदेखील आहे. कारण त्यामुळे प्रसार करु शकतो. पावसाळा येणार असल्याने मोठं आव्हान आहे. आपल्याकडे सर्दी, खोकल्याची साथ नसतानाही करोनाचा प्रसार होत आहे. थकवा येणं, कंटाळा करणंही करोनाचं लक्षण आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.