महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा पंढरपूरच्या वारीसारखा आहे. वारीमध्ये जात, धर्म नसतो, तशीच ही अयोध्येची वारी आहे. त्यामध्ये घटकपक्षाच्या नेत्यांनी सुद्धा सहभागी व्हावे. घटकपक्षाचे नेते येणार असतील, तर त्यांना सुद्धा घेऊन जाऊ असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

वीर सावरकरांनंतर जे हिंदुत्व देशाला अभिप्रेत होतं तो विचार बाळासाहेबांनी रुजवला. काही लोकांना पालवी फुटतेय. ती फुटूंदे, बाळासाहेब आणि शिवसेनेला तोड नाही असे संजय राऊत यांनी सांगितले. मनसेची हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, त्या अनुषंगाने संजय राऊत यांना काही पक्षांची हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे असा प्रश्न विचारला.

त्यावर त्यांनी काही पक्षांविषयी माहिती नाही. शिवसेना आपल्या भूमिकेवर, विचारांवर ठाम आहे. हिंदुत्व हा टक्कर देण्याचा विषय असू शकत नाही असे राऊत म्हणाले. सत्ता येते जाते. पाय जमिनाीवर ठेवायला आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं. बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नाही तर, महाराष्ट्राचे देशाचे दैवत आहे. जगज्जेते कोणात्याही सत्तेवर, पदावर नव्हते. अलेक्झांडर प्रमाणे ते वावरले लोकांना गोळा करुन प्रेरणा दिली आजही शिवसेना त्याच मार्गावरुन पुढे जातेय असे राऊत म्हणाले.