राज्यात एकीकडे करोनाने कहर घातला असताना रेमडेसिवीर, ऑक्सिजन तसंच बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरुन राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असून राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे राज्य सरकार केंद्राकडे मदत मागत असताना भाजपा नेते ठाकरे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत आहेत. वादग्रस्त वक्तव्यांची सध्या मालिका सुरु असताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे.

“भाजपाच्या लोकांचं नीच राजकारण सर्व महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंपा नावाचे ते चंद्रकांत पाटील…आज हा करोना कोणा पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही. करोना फक्त काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला होत नाही. तर हा करोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला विळखा घालत आहे. आज बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला देण्यासाठी लसी आहेत, पण महाराष्ट्राला नाही. बांगलादेश, पाकिस्तान महाराष्ट्रपेक्षा जास्त महत्वाचे आहेत का? ही राजकारण करण्याची वेळ आहे,” असं ते म्हणाले आहेत.

“त्यांच्या १०५ आमदारांनादेखील महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले आहे हे भाजपाने विसरु नये. त्यांचे २० खासदारदेखील महाराष्ट्राने निवडून दिले आहेत. अशावेळी केंद्रांकडून राज्यातील लसनिर्मिती कंपन्याना सांगितलं जातं की तुम्ही महाराष्ट्राला लस, तसेच रेमडेसिविर देऊ नका. केंद्राकडे ऑक्सिजनची देखील मागणी केली तरी केंद्र सरकार देत नाही,” अशी टीका त्यांनी केली आहे.

“मोदी सरकार, फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. फडणवीस मुख्यमंत्री असते तर नरेंद्र मोदींनी काय केलं असतं? चंद्रकांत पाटील मंत्री असते तर काय केलं असतं? राज्यातील मंत्री जीव तोडून नियोजन करत असताना मदत करायची सोडून राजकारण करत आहेत, खिल्ली उडवतात. हे सरकार अपयशी होईल हे पाहतात. पण यामध्ये लाखो लोक मरतील त्याचं काय?,” अशी विचारणा संजय गायकवाड यांनी केली आहे.

“मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते, इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झाला आहे. म्हणून राजकारण न करता राज्याला मदत केली पाहिजे. आधी महाराष्ट्र जगला पाहिजे, नंतर राजकारण आहे. माणसंच मेली तर कोण मतदान करणार आहे तुम्हाला,” असं शेवटी ते म्हणाले आहेत.