उजनी धरणातील पाण्यावरुन सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील वाद येत्या काही दिवसांत पेटण्याची चिन्हं आहेत. उजनी धरणातील पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी इंदापूरला देण्यावरून सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सध्या वाद रंगला आहे. दरम्यान एकीकडे विरोधक यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधत असताना शिवसेना आमदाराने घरचा आहेर देत वादाच उडी घेतली आहे.

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दिपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांना जागृत करत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या दारासमोर हालगी नाद आंदोलन केलं जात आहे. सांगोलाचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी त्यांनीदेखील विरोध दर्शवक अशा पद्धतीचा निर्णय झाला तर रक्तरंजित लढाईला तयार रहावे असा इशारा ठाकरे सरकारला दिला.

“…तर शरद पवारांनी उजणी धरणच पुणे जिल्ह्यात वळवलं असतं,” शिवसेना आमदाराच्या टीकेमुळे वाद पेटण्याची चिन्हं

सोलापूरमधील लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून अचानकपणे महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला असल्याची टीका त्यांनी केली. लोकप्रतिनिधी आणि सरकारमध्ये समन्वय हवा होता असंही ते म्हणाले आहेत. सोलापूरला सिंचनासाठी इतर कोणत्याही धरणावर अवलंबून राहता येणार नसल्याने उजनी जिल्ह्याचा आणि शेतकऱ्यांचा प्राण आहे असं त्यांनी सांगितलं. हे अन्यायकारक असून शिवसेना आमदार म्हणून सर्व शक्ती पणाला लावणार असून कायदेशीर लढाई लढू आणि रक्तरंजित लढाईला तयार रहावे असा इशारा त्यांनी दिला.

शरद पवारांवर टीका
“राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आह हे देशभर सांगायचं ही पवारांची पद्धत आहे. शरद पवार राज्याचे नेते पण फक्त बारामतीचा विकास केला,” असा आरोप आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे.

उजनीच्या पाण्यावरून सोलापूर – पुणे जिल्ह्यात वाद

“उजनी धरणातून शरद पवारांनी बारामती एमआयडीसी, बारामती शहर आणि सिनर्मास प्रकल्पाला पाणी नेलं. एवढं पाणी देऊनही शरद पवारांना पाणी कमी पडतंय असं वाटत आहे. उजनी धरणच पुणे जिल्ह्यात वळवण्याची काही यंत्रणा असती तर ते धरण सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेलं असतं,” अशी टीका शहाजी पाटील यांनी केली आहे.