सूडबुद्धीने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून महाराष्ट्राचं राजकारण बिघडवलं जात असल्याचं टीकास्त्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोडलं आहे. “दहशत निर्माण केली जात आहे. हे फार काळ चालणार नाही. देशात असे अनेक प्रसंग आले आणि गेले. अशा प्रकारे तपास यंत्रणा वापरून दहशत निर्माण करणाऱ्या नेत्यांचं देशातून अस्तित्व संपलं आहे.”, असं परखड मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.

“प्रसाद लाड यांचं प्रकरण गंभीर आहे. इथं ईडी किंवा सीबीआय का जात नाही? असा प्रश्न पडतो. आम्ही पत्ता देऊ, पत्ता केवळ एकनाथ खडसेंचाच द्यायला पाहिजे असं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या लोकांचेच त्यांच्याकडे पत्ते आहेत का? आमच्याकडे देखील काही पत्ते आहेत ते आम्ही देऊ”, अस संजय राऊत म्हणाले.

फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार; राज्य सरकारनं केली तीन सदस्यीय समिती गठित!

“पिंपरी-चिंचवडमध्ये जे काही चाललंय, महानगर पालिकेमध्ये जनतेच्या पैशांची ही लूट होत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते मुंबईमध्ये बसलेले आहेत. त्यांनी यावर मत व्यक्त केलं पाहिजे. इतरांवर बोलत आहेत. त्यांनी यावर बोलणं गरजेचं आहे.”, असा आरोप संजय राऊत यांनी केला. “भाजपाला स्वतःवरील टीका सहन होत नाही. सत्य चालत नाही. याला राजकारण म्हणत नाहीत. ज्या पद्धतीने सूडबुद्धीने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून महाराष्ट्राचं राजकारण बिघडवल जातंय, दहशत निर्माण केली जात आहे. हे फार काळ चालणार नाही. देशात असे अनेक प्रसंग आले आणि गेले. अशा प्रकारे तपास यंत्रणा वापरून दहशत निर्माण करणाऱ्या नेत्यांचं अस्तित्व संपलं आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाची प्रतिष्ठा घालवत आहेत.” असं देखील संजय राऊत यांनी पुढे सांगितलं.