महाराष्ट्राच्या सत्तेवर भाजपची मालकी आहे शिवसेनेची साथ ही फक्त नावापुरती आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. भाजपकडून शिवसेनेवर जेवढी टीका होते तेवढी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर होत नाही त्यामुळे आगामी काळात भाजप हाच आमचा विरोधी पक्ष असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीसाठी नाशिकमध्ये आलेल्या संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.

शिवसेना आणि भाजप यांचे संबंध ताणले गेलेले असताना मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे असा प्रश्न विचारला असता, शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते असे बालिश राजकारण करतील असे वाटत नाही असे राऊत यांनी म्हटले. तसेच फेरीवाल्यांच्या प्रश्नावरही त्यांनी रोखठोक भूमिका मांडली.

फेरीवाल्यांसंदर्भात सर्वात आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवला होता असे त्यांनी म्हटले. तसेच जोवर मुख्यमंत्री पोलीस संरक्षण देत नाहीत तोवर महापालिका अतिक्रमण कसे काढू शकेल? असाही प्रश्न त्यांनी विचारला. गो. रा. खैरनार यांना शिवसेनेने सर्वप्रथम जनतेसमोर आणले. शिवसेनेने त्यावेळी खैरनार यांना पाठिंबा दिला म्हणूनच त्यावेळी मुंबईने मोकळा श्वास घेतला होता असेही राऊत यांनी स्पष्ट केले.