पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर नवी दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोनावर भाष्य केलं असून चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकादेखील केली. देशात अशी नवी आंदोलनजीवी जमात उदयाला आली आहे, जनतेनं त्यांच्यापासून सावध रहावं, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या या टीकेवर भाष्य केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“…ही तडफड असते,” वचन न दिल्याच्या अमित शाह यांच्या दाव्यावर संजय राऊतांचं उत्तर
“देशाच्या पंतप्रधानांच्या भूमिकेचा आदर राहिला पाहिजे. राजकीय मतभेद एका बाजूला, पंतप्रधान सांगत आहेत तेव्हा त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. पण पंतप्रधानांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला पाहिजे, शेतकरी अज्ञान आहेत. त्यांना त्यांची जमीन, पीक, एमएसपी यापलीकडे काही माहिती नाही. तुम्ही सगळे ज्ञानदेव आहात, तुम्ही भिंत चालवू शकता….भिंत चालवा आणि गाझीपूरला चला,” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
देशात नव्या ‘आंदोलनजीवी’ जमातीचा उदय, जनतेनं त्यांच्यापासून सावध रहावं – पंतप्रधान
“जर आंदोलन हायजॅक होत आहे असं वाटत असेल तर चार शेतकरी नेत्यांना बोलवा आणि थेट चर्चा करा. तीन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल घेणार की नाही? संसदेत भाषण केलं, बाहेर भाषण केलं पण निष्पन्न काय झालं?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मला आदर आहे. देशानं त्यांच्याविषयी आदर ठेवला पाहिजे. त्यांच्या काही भूमिका पटत नसतील, त्यावर आपण टीका करतो..पण आम्ही कधीही पंतप्रधानपदाची आणि त्या व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होईल अशी टीका करणार नाही. मोदींनी सर्व गोष्टी खिलाडू वृत्तीने स्वीकारल्या पाहिजेत त्यातच लोकशाहीचं कल्य़ाण आहे”.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2021 5:49 pm